Pune : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit pawar) यांच्या अकाली निधनाने राज्याच्या राजकीय वर्तुळातही मोठी पोकळी निर्माण झाली आहे. काल झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधान झाले. यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. आज बारामतीत शासकीय इतमामात अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लाखोंचा जनसागर अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होता. आता अजित पवार यांचा राजकीय वारसा यापुढे कोण चालवणार? असा सवाल उपस्थित होत आहे. याबाबत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांचं जाणं दुःख देणार आहे. अजित पवार यांचा वारसा चालवायला त्यांची मुलं अनुभवी नाहीत, त्यामुळं सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री केलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली आहे.
नेमकं काय म्हणाले रामदास आठवले?
अजित पवार यांचं जाण दुःख देणार आहे. अजित पवारांचं मुख्यमंत्री होण्याच स्वप्न अधुर राहिल्याचे आठवले म्हणाले. अजित पवारांचा वारसा चालवायला त्यांची मुलं अनुभवी नाहीत, त्यामुळे सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री केलं पाहिजे असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले. त्यांना उपमुख्यमंत्री केलं तर अजित पवारांचा वारसा नीट पुढे चालेल असे आठवले म्हणाले. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही अजित पवारांची इच्छा होती आता दादा गेल्यावर त्यांनी एकत्र यावं असेही आठवले म्हणाले. शरद पवार यांनी त्यांचे विचार बदलून एकत्र येऊन NDA मध्ये यायला पाहिजे. त्यामुळं सुप्रिया सुळे यांना मंत्रिपद मिळेल आणि आम्हाला देखील चांगलं वाटेल असे रामदास आठवले म्हणाले. राज्यात सुनेत्रा पवार आणि केंद्रात सुप्रिया सुळे असे करायचं असेल तर शरद पवारांनी आता एकत्र येण्याची भूमिका घेतली पाहिजे असेही रामदास आठवले म्हणाले.
केंद्रीय मंत्र्यांपासून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व पक्षीय नेते, पदाधिकारी कार्यकर्ते, आमदार, खासदार उपस्थित
राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवारी ( 28 जानेवारी) बारामती येथे विमान अपघातात निधन झालं. आज त्यांच्या पार्थिवाला बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात शासकीय इतमामात मुखाग्नी देण्यात आला. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी बारामतीमध्ये हजारोंचा जनसमुदाय लोटला होता. दादांच्या अकाली जाण्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राज्याचे 'लाडके दादा' अनंतात विलीन झाले आहेत. केंद्रीय मंत्र्यांपासून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व पक्षीय नेते, पदाधिकारी कार्यकर्ते, आमदार, खासदार यांच्या उपस्थितीत अजित दादांना अखेरचा निरोप देण्यात आला. 'एकच दादा अजित दादा' अशी अखेरची घोषणाबाजी चाहत्यांनी केली. कदाचित पुन्हा ही घोषणा ऐकूच येणार नाही. आपले लाडके दादा हरपल्याची भावना प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आहे. अजित पवारांच्या अनपेक्षित निधनाने बारामतीकर पोरके झाले आहेत. आमचा नेता गेला आता का राहायचं राजकारणात? अशा भावना कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.
महत्वाच्या बातम्या: