Airoli-Katai Naka Freeway: नवी मुंबईवरुन कल्याण - डोंबिवलीत 15 मिनिटांत जाता येणार; फ्रीवेचं 80 % काम झालं, खाडीवरून रस्ता अन् भुयारी बोगदे .. कधी होणार सुरु?
Airoli-Katai Naka Freeway: ऐरोली-कटाई नाका उन्नत मार्ग जवळपास अंतिम टप्प्यात पोहोचला असून, या प्रकल्पाचे सुमारे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे.

Airoli Katai Naka Freeway: वाहतूक कोंडी काही मुंबईकरांना नवी नाही. कार्यालयीन वेळा, शालेय बस, जड वाहने आणि सतत वाढणारी लोकसंख्या यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीदरम्यानचा प्रवास अधिकच त्रासदायक ठरत आहे. मात्र, आता या त्रासातून मुंबईकरांची मोठ्या प्रमाणात सुटका करणारी बातमी समोर आली आहे. एमएमआरडीएकडून (MMRDA) उभारण्यात येणारा ऐरोली-कटाई नाका उन्नत मार्ग जवळपास अंतिम टप्प्यात पोहोचला असून, या प्रकल्पाचे सुमारे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. 2018 मध्ये या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले होते.
नवी मुंबई ते कल्याण- डोंबिवली प्रवास अवघ्या 15 मिनिटांत होणार
हा फ्रीवे सुरू झाल्यानंतर नवी मुंबई ते कल्याण-डोंबिवली दरम्यानचा प्रवास अवघ्या 15 मिनिटांत पूर्ण होणार आहे. सध्या याच मार्गासाठी वाहनचालकांना ठाणे, मुंब्रा आणि दिवा परिसरातील प्रचंड ट्रॅफिकला सामोरे जावे लागते. ऐरोली-कटाई नाका मार्ग सुरू झाल्यावर मुंबईहून कल्याणकडे जाणाऱ्या आणि कल्याणहून मुंबईकडे येणाऱ्या वाहनांना थेट आणि जलद पर्याय उपलब्ध होणार आहे.
या मार्गाची वैशिष्टये काय?
हा प्रकल्प मूळ ऐरोली-मुंब्रा उन्नत मार्गाचा विस्तार असून, देसाई खाडीवरून जाणारा रस्ता आणि पारसिक डोंगरातून जाणारा भुयारी बोगदा ही या मार्गाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. 2018 मध्ये या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले होते. एकूण 6.71 किमी लांबीच्या या मार्गामध्ये दोन टप्प्यांत काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात ठाणे-बेलापूर मार्ग ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 पर्यंत उन्नत रस्ता तयार करण्यात येत आहे. तर दुसऱ्या टप्प्यात ऐरोली पुलापासून ठाणे-बेलापूर मार्गावरील भारत बिजली परिसरापर्यंत जोड रस्ता उभारण्यात येत आहे.
4 भुयारी बोगदे, वाहनांची गर्दी होणार कमी
या फ्रीवेवर चार-चार मार्गिकांचा भुयारी बोगदा असणार असून, त्यामुळे जड वाहनांची गर्दी ऐरोली आणि ठाणे परिसरातून कमी होईल. परिणामी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील अंतर्गत रस्त्यांवरील ताण मोठ्या प्रमाणात घटेल. वेळेची बचत, इंधन खर्चात कपात आणि प्रदूषण कमी होण्यासही मदत होणार आहे. एमएमआरडीएच्या माहितीनुसार, काम नियोजनानुसार सुरू असून वर्षाअखेरीस हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. हा फ्रीवे सुरू झाल्यानंतर मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान, सुलभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Before You Go
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
महत्त्वाच्या बातम्या






















