Aaditya Thackeray : गेली अडीच वर्ष झालं आम्ही गद्दरांशी लढत होतो, आता ईव्हीएम सोबत लढत असल्याचे वक्तव्य युवासेनाप्रमुख आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केलं. आता काहीजण स्वार्थासाठी गद्दारी करत आहेत, तिकडे जात असल्याचे ठाकरे म्हणाले. आम्ही महाराष्ट्र मुंबईसाठी लढत आहोत, कोणीही गेले तरी आम्ही लढत राहणार असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
विधानसभा निवडणुकीनंतर आता सर्वांनाच वेध लागले ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, महापालिका निवडणुकांचे. विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गटाकडून महापालिका निवडणुकांची तयारी देखील सुरू झाली आहे. मुंबई महापालिकेत स्वतंत्रपणे उमेदवार देण्याची घोषणाच खासदार संजय राऊत यांनी केली आहे. त्यामुळे, महापालिका निवडणुकांसाठीची मोर्चबांधणी सुरू झाली असून आजच पुण्यात बैठक घेण्यात आली आहे. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटानेही कंबर कसली असून ऑपरेशन टायगर सुरू केल्याचं मंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितलं होतं. त्या अनुषंगाने ठाकरे गटाला धक्का देत काही नेत्यांचा हाती शिवधनुष्य देऊन उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) धक्का दिला जात आहे. त्यातच, आता आगामी महापालिका निवडणुकांपूर्वीच ठाकरेंना मुंबईत मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या, विधानसभा महिला संघटक आणि माजी नगरसेवक राजुल पटेल शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. राजुल पटेल यांनी वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून यावेळी उमेदवारी मागितली होती. मात्र, त्यांच्याऐवजी हारून खान यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली होती.
कोण आहेत राजुल पटेल?
राजुल पटेल या शिवसेनेच्या माजी नगरसेविका म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेत कार्यरत होत्या, त्याशिवाय त्यांनी 2019 साली विधानसभा निवडणूक सुद्धा लढवली होती. ठाकरेंच्या शिवसेना पक्षातील जुन्या महिला शिवसैनिक म्हणून राजुल पटेल यांची ओळख आहे. त्यामुळे, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यास ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण, वर्सोवा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात असून या मतदारसंघात राजूल पटेल यांचं राजकीय वजन आहे. मात्र, विधानसभा निवडणुकांपासून त्या नाराज असल्याने महापालिका निवडणुकांचा मुहूर्त साधण्याचा प्रयत्न त्यांनी केल्याचं बोललं जात आहे.
एसटी भाडेवाढीच्या संदर्भात देखील आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. निवडणुकीच्या आधी हे मोफत देऊ ते मोफत देऊ असे चालेले होते. आता भाडेवाढ करत आहेत.
पुढचे 6 महिन्याचे पैसे आता लाडक्या बहिणींना द्या अशी आमची मागणी असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.