ABP News C Voter Survey On NCP Crisis: महाराष्ट्रात एका मोठ्या राजकीय घडामोडीनंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप झाला आहे. राष्ट्रवादीचे (NCP)  नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी काही नेत्यांसह बंडखोरी करत एनडीएमध्ये सामील झाले आहेत. एवढंच नाहीतर अजित पवारांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टिकास्त्र डागली आहेतच, पण राष्ट्रवादीच्या नावावर आणि चिन्हावरही त्यांनी दावा केला आहे. अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारही दंड थोपटून मैदानात उतरले आहेत. शरद पवारांनी महाराष्ट्र पिंजून काढायचा ठरवलं असून अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या बंडखोर आमदारांनाही खडे बोल सुनावले आहेत. बंडखोरांची अधिकृतपणे पक्षातून हाकालपट्टी करत शरद पवारांनी पक्ष मी स्थापन केला असून पक्षाचा अध्यक्ष मीच आहे, असं स्पष्ट केलं आहे.  


अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. अजित पवारांच्या बंडानंतर पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाला अभूतपूर्व कलाटणी मिळाली. सर्व समीकरणंच बदललीच. पण अजुनही अजित पवारांनी केलेल्या बंडाबाबत अनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहेत. तसेच, अजित पवारांनी उचललेल्या पावलामागे थोरल्या पवारांचाच हात आहे, असाही अद्याप अनेकांचा समज आहे. 


अजित पवार यांनी 2 जुलै रोजी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या आठ नेत्यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. या बंडानंतर अनेक प्रकारचे तर्क-वितर्क लावले जात आहेत. अशा राजकीय वातावरणात, महाराष्ट्रातील लोकांचे मत जाणून घेण्यासाठी, सी-व्होटरनं एबीपी न्यूजसाठी एक सर्वेक्षण केलं आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी हे सर्वेक्षण करण्यात आलं आहे. सर्वेक्षणाचा निष्कर्ष समोर आला असून जनतेनं अनेक धक्कादायक मतं या सर्वेक्षणातून मांडली आहेत. 


राष्ट्रवादीतील बंडावर सर्वेक्षण 


राष्ट्रवादीतील फुटीबाबत केलेल्या या जलद सर्वेक्षणात अजित पवारांनी जे केलं त्यामागे शरद पवार आहेत का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे अनेक आश्चर्यकारक निष्कर्ष सर्वेक्षणातून समोर आले आहेत. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 37 टक्के लोकांनी होय, अजित पवारांच्या या खेळीमागे शरद पवारचं असल्याचं सांगितलं आहे, तर 49 टक्के लोकांचं मत आहे की, तसं अजिबातच नाही. तसेच, 14 टक्के लोकांनी सर्वेक्षणात विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना आम्हाला माहिती नाही, असं म्हटलं आहे. 


अजित पवारांनी जे केलं त्यामागे थोरल्या पवारांचाच हात?



  • हो : 37 टक्के

  • नाही : 49 टक्के

  • माहिती नाही : 14 टक्के


दरम्यान, सी-व्होटरनं एबीपी न्यूजसाठी हे सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेक्षणात महाराष्ट्रभरातील तब्बल 1 हजार 790 लोकांना सहभागी करुन घेण्यात आलं. याच आठवड्यात गुरुवारी (6 जुलै) आणि शुक्रवारी (7 जुलै) हे सर्वेक्षण करण्यात आलं. वर मांडण्यात आलेला सर्वेक्षणाचा निष्कर्ष केवळ लोकांशी झालेल्या संवादावर आणि त्यांनी व्यक्त केलेल्या मतांवर आधारित आहे. सर्वेक्षणातील मार्जिन ऑफ एरर प्लस मायनस 3 ते प्लस मायनस 5 टक्के आहे. याला एबीपी न्यूज जबाबदार नाही.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Maharashtra Election Survey: महाराष्ट्रात आजच लोकसभा निवडणुका झाल्या, तर कोण मारणार बाजी? सर्वेक्षणाचा धक्कादायक निष्कर्ष