उस्मानाबाद : प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या चर्चेत एक पाऊल पुढ पडलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काल दोन्ही काँग्रेसचे नेते आणि प्रकाश आंबेडकरांच्या दरम्यान झालेल्या चर्चेत वंचित आघाडीला 6 जागा देण्याची तयारी दाखवली आहे. सुरुवातीपासून फक्त अकोल्याची एकच जागा सोडू अशी भूमिका घेणाऱ्या दोन्ही काँग्रेसच्या भूमिकेत हा मोठा बदल झाला आहे. तर सुरुवातीला सहा जागांच्या मागणीनंतरही प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेच्या किमान 12 आणि विधानसभेच्या 24 जगांचा आग्रह धरल्याची चर्चा आहे.


नुकतीच भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या मुंबई येथील राजगृह या निवासस्थानी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांची बैठक पार पडली होती. या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, काँग्रेस नेते आणि विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ आदी नेते उपस्थित होते.

नुकतेच प्रकाश आंबेडकर आणि एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली होती. राज्यातील अनेक जिल्ह्यात वंचित आघाडीच्या सभाही पार पडल्या. या सभांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. यानंतर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी प्रकाश आंबेडकर यांना आघाडीत येण्याचं आवाहन करत आहेत. मात्र एमआयएमला सोबत घेण्यास काँग्रेस-राष्ट्रवादीचा विरोध होता. याविषयी बोलताना ओवेसी म्हणाले होते की, एमआयएम नको असेल तर मी आघाडीतून बाहेर पडायला तयार आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस-राष्ट्रवादीमधील महाआघाडीचा मार्ग मोकळा झाला होता.

काय म्हणाले होते ओवेसी ?
"तुम्ही प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोला, त्यांना हव्या तितक्या जागा द्या. मी एकही जागा लढवणार नाही. वंचित बहुजन आघाडीच्या व्यासपीठावरही येणार नाही. मात्र प्रकाश आंबेडकर यांच्या अटी मान्य करा आणि आघाडी करा. प्रकाश आंबेडकर यांच्या अटी मान्य केल्यास मी स्वतंत्र सभा घेऊन आघाडीचं स्वागत करेन", असं खुलं आव्हान असदुद्दीन ओवेसी यांनी दिलं होतं.

व्हिडीओ :