जालना : शॉर्टसर्किटमुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास गेला आहे. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातल्या भोगाव येथे आग लागून 10 शेतकऱ्यांचा अंदाजे 20 एकरातील ऊस जळून खाक झाला. दुपारी 3 च्या सुमारास ही घटना घडली.




वाऱ्यामुळे लोंबकळणाऱ्या विजेच्या तारांमध्ये घर्षण होऊन स्पार्किंग झाल्याने ही आग लागल्याचं शेतकऱ्यांच म्हणणं आहे. जोराचा वारा सुटल्याने ही आग एका शेतातून दुसऱ्या शेतात पसरली. पाहता पाहता ही आग जवळपास 20 एकरात पोहोचली.



वाऱ्यामुळे आग अधिकच भडकल्याने शेतकऱ्यांनी ती विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात येईपर्यंत अंदाजे 20 एकरातील ऊस जळून नष्ट झाला. तोंडाशी आलेला घास अशा दुर्घटनेत हिरावल्याने शेतकरी हळहळ व्यक्त करत आहेत.