नवी मुंबई : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी सनातन संस्थेचा पाय आणखी खोलात जाताना दिसत आहे. कारण पनवेलमधून सनातन संस्थेच्या वीरेंद्र तावडे पाठोपाठ दोन महिला साधकांना एसआयटीने ताब्यात घेतलं आहे. पनवेल इथल्या 'सनातन' आश्रमात सापडलेल्या नार्कोटिक औषधांच्या साठ्याप्रकरणी ही कारवाई केली आहे.


गोवा आश्रमातील महिला डॉक्टर आशा ठक्करसह आणखी एका महिलेला एसआयटीने ताब्यात घेतलं आहे. पनवेलच्या आशा ठक्कर वीरेंद्र तावडेच्या सांगण्यावरुन आश्रमातील साधकांना औषध देत होत्या. त्यामुळे आशा ठक्करला पानसरे हत्येप्रकरणाची माहिती असल्याच्या संशयातून पोलिसांना त्यांना ताब्यात घेतलं आहे.

डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी वीरेंद्र तावडेवर आरोपपत्र दाखल केलं आहे. आता पानसरे हत्येप्रकरणी सनातनचे आणखी काय संबंध पुढे येतात हे पाहणं महत्वाचं आहे.