मुंबई : राज्यातील कृषीपंपधारक थकबाकीदार शेतकऱ्यांना थकित वीज बिल भरण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला.


30 ऑक्टोबरलाच थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना-2017 ची घोषणा केली होती. या घोषणेनुसार शेतकऱ्यांना 7 नोव्हेंबरपर्यंत थकबाकीचा पहिला हफ्ता भरायचा होता. ही मुदत आता 15 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

चालू महिन्यातील वीज बिल 15 नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांना आता भरता येईल. 15 नोव्हेंबरपर्यंत कोणत्याही शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन खंडीत केलं जाणार नाही. तसंच मुद्दल रक्कमेचे पाच हफ्ते करण्यात आले असून मुद्दल रक्कमेचे पाच हफ्ते डिसेंबर 2017 ते डिसेंबर 2018 या कालावधीत शेतकऱ्यांनी भरायचे आहे.

ज्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत वीज बिल वितरीत करण्यात आलं नाही, त्या शेतकऱ्यांना महावितरणने त्वरीत वीज बिलाची वाटप करण्याच्या सूचनाही आज दिल्या.  मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना 2017 चा लाभ शेतकऱ्यांनी घेतला तर शेतकऱ्यांचं बिलावरील दंड आणि व्याज माफ होणार आहे.

काय आहे मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना?

थकित बिल 30 हजार रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांना पाच टप्प्यात हफ्ते करुन वीज बिल भरता येईल. डिसेंबर 2017, मार्च 2018, जून 2018, सप्टेंबर 2018 आणि डिसेंबर 2018 या हफ्त्यांमध्ये शेतकऱ्यांना वीज बिल भरता येईल.

थकित वीज बिल 30 हजार रुपयांपेक्षा जास्त असलेल्या शेतकऱ्यांना 45 दिवसाचे 10 समान हफ्त्यांमध्ये वीज बिल भरता येईल. या योजनेचा लाभ घेऊन थकीत बिल भरतील त्यांचं सर्व व्याज आणि दंड माफ केला जाणार आहे.

दरम्यान 19 हजार 282 कोटी रुपयांची थकबाकी 2012 पासूनची असल्याचा दावा बावनकुळे यांनी केला. या योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या थकीत बिलाचे 8 हजार 164 कोटी आणि दंडाचे 218 कोटी माफ केले जाणार आहेत.

संबंधित बातमी : थकित कृषी वीज बिल भरण्यासाठी सरकारची खास योजना