BJP : राष्ट्रवादीमुळे भाजपाचं वाटोळं झालं, राष्ट्रवादीशी युती का केली हे कळायला मार्ग नाही; भाजप जिल्हाध्यक्षाचा पक्षाला घरचा आहेर
BJP Vs NCP Latur : भाजप-शिवसेना सख्खे भाऊ तर राष्ट्रवादी हा सावत्र भाऊ असल्याचं सांगत राष्ट्रवादीमुळे भाजपचं वाटोळं झाल्याची टीका लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख यांनी केली.

लातूर : विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आली असताना आता महायुतीतील बेबनाव समोर येत असल्याचं दिसतंय. तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीला संबोधून केलेल्या वक्तव्यानंतर आता भाजपच्या लातूरमधील पदाधिकाऱ्यांनीही तशीच भूमिका घेत राष्ट्रवादीवर टीका केली. भाजप आणि शिवसेना हे सख्खे भाऊ आहेत तर राष्ट्रवादी हा भाजपाचा सावत्र भाऊ आहेत. राष्ट्रवादी सोबत भाजपाने युती का केली हेच कळायला मार्ग नाही असं वक्तव्य लातूर भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख यांनी केलं. राष्ट्रवादीला सोबत घेतल्याने भाजपचं वाटोळं झालंय असं कार्यकर्त्यांना वाटतंय असंही ते म्हणाले.
राज्यात तीन पक्षाचे सरकार आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत भाजपने कशासाठी युती केली हेच कळायला मार्ग नाही. इतकी भानगड झाली आहे की आता कार्यकर्त्यांना वाटतंय की राष्ट्रवादीला युतीमध्ये घेऊन आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा चांगलं झालं नाही, लय वाटोळं झालंय अशी प्रतिक्रिया भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख यांनी दिली.
राष्ट्रवादी-भाजपची युती दुर्दैवी, प्रवक्त्याचे वक्तव्य
त्या आधी भाजप प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनीही अशाच प्रकारचं वक्तव्य केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसोबतची भाजपची युती दुर्देवी होती, हा असंगाशी संग असल्याची टीका त्यांनी केली. अहमदपुरात भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आमने-सामने आल्यानंतर भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी ही तिखट प्रतिक्रिया दिली.
भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांच्या टीकेनंतर अजित पवारांनी त्यावर प्रतिक्रिया दिली होती. भाजप आणि राष्ट्रवादीची युती ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करून झालेली आहे. याबाबत मी उत्तर देणे अपेक्षित नाही असं ते म्हणाले.
अजित पवारांच्या आमदाराची अडचण वाढली
अजित पवारांच्या प्रतिक्रियेनंतर भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख यांनी आपली तिखट प्रतिक्रिया दिली. यामुळे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्यासमोरच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
तानाजी सावंतांची राष्ट्रवादीवर टीका
विधानसभा निवडणूक तोंडावर असताना महायुतीत सारं काही आलबेल नसल्याचं चित्र दिसतंय. राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसतो, पण बैठक झाल्यानंतर बाहेर येऊन उलटी होते असं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांनी केलं होतं.
तानाजी सावंत यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली असून मुख्यमंत्र्यांनी सावंतांना सज्जड दम द्यावा अशी मागणी केली आहे.
ही बातमी वाचा:
Before You Go
Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद






















