अमेरिका अन् आखाती देशातील युद्धाचा थेट लातूरवर परिणाम; शेकडो टन माल अडकला, कोट्यावधींची उलाढाल ठप्प
लातूरमधून अफगाणिस्तान आणि उझबेकिस्तानला कृषी उत्पादने निर्यात करणारे श्रीहरी काल्या यांनाही या परिस्थितीचा मोठा फटका बसला आहे.

लातूर : जगाचं लक्ष लागलेल्या इराण(Iran) आणि इस्रायल–अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचे पडसाद जागतिक व्यापारावर उमटू लागले आहेत. या युद्धजन्य परिस्थितीचा थेट फटका निर्यातीला बसत असून निर्यातदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विशेष म्हणजे या युद्धजन्य परिस्थितीचा थेट फटका महाराष्ट्रातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांनाही बसत असल्याचे दिसून येते. जळगावातील केळी, तर नाशिकमधील द्राक्षे उत्पादक शेतकऱ्यांच्या मालावर याचा परिणाम झाल्याचं दिसून आलं. दुसरीकडे लातूरमधील व्यापारी बाजारपेठेलाही याचा फटका बसला आहे. लातूरच्या (Latur) व्यापाऱ्यांचा माल इराण आणि मुंबई बंदरात अडकल्याने कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली आहे.
लातूरमधून अफगाणिस्तान आणि उझबेकिस्तानला कृषी उत्पादने निर्यात करणारे श्रीहरी काल्या यांनाही या परिस्थितीचा मोठा फटका बसला आहे. गेल्या चार दिवसांपासून त्यांचा माल इराण आणि मुंबई येथील बंदरात अडकून पडला आहे. लातूर येथील व्यापारी श्रीहरी काल्या हे गेल्या चार वर्षांपासून सोयाबीन डीओसी, कबुली चणा आणि मका यांसारख्या कृषी उत्पादनांची निर्यात करीत आहेत. मुंबईतील न्हावा शेवा बंदर येथून जलमार्गे माल इराणमधील सर्वात मोठ्या बंदर अब्बास बंदर येथे पाठवला जातो. त्यानंतर तेथून रस्तेमार्गे माल अफगाणिस्तान आणि उझबेकिस्तानला रवाना केला जातो . आजमीतिला ही सर्व यंत्रणा ठप्प पडली आहे.
250 टन माल इराणमध्ये अडकला
सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे बंदर अब्बास येथे सुमारे २५० टन निर्यात माल अडकून पडला आहे. इराणमधील परिस्थितीमुळे आयातदारांनी अद्याप हा माल उचललेला नाही.
800 टन माल न्हावा शेवा येथे थांबला
त्याचबरोबर न्हावा शेवा बंदरावर सुमारे 800 टन माल गोदामात अडकून आहे. पुढील वाहतुकीबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. लातूरमधील फॅक्टरीत आणखी 175 टन माल निर्यातीसाठी तयार असून तोही सध्या थांबवण्यात आला आहे.
पेमेंट अडकल्याने आर्थिक ताण
बंदरात अडकलेला माल ग्राहकांपर्यंत पोहोचलेला नसल्याने आम्हाला पेमेंटही मिळालेले नाही. त्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची माहिती श्रीहरी काल्या यांनी दिली.
राज्यातील इतर निर्यातदारही अडचणीत
आखाती देशांना निर्यात करणाऱ्या राज्यातील अनेक निर्यातदारांची परिस्थिती याचप्रमाणे असल्याचे त्यांनी सांगितले. जागतिक संघर्षाचा थेट परिणाम लातूरसारख्या जिल्ह्यातील उद्योगांवर होत असल्याने व्यापारी वर्गात सध्या चिंतेचे वातावरण आहे, असे श्रीहरी काल्या यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.
























