कोल्हापूर : किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण मुक्ती आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने विशाळगड परिसरातील वाहनांची तोडफोड तसेच घरांची तोडफोड करण्यात आली. यानंतर आता कोल्हापूर पोलिसांकडून गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विशाळगड परिसरात झालेले हिंसाचारानंतर पुण्यातील रवींद्र पडवळ आणि कोल्हापुरातील बंडा साळोखे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


विशाळगड अतिक्रमण मुक्ती आंदोलनाला गालबोट


दरम्यान, कोणत्याही परिस्थितीत विशाळगडावर जाणार अशी भूमिका घेतलेल्या संभाजी राजे छत्रपती यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशाळगड अतिक्रमण मुक्ती आंदोलनाला गालबोट लागल्याने परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये हिंसाचार झाला. अनेक ठिकाणी तोडफोड करण्यात आली. गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया शाहूवाडी पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे. दरम्यान, 500 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कलम 132,  189 ( 2), 190, 191 (2) , 191 (3),323, 298, 299 (49), 189 (5 ) यासह  पोलिस अधिनियम 37 (1) उल्लघन 135  या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पुण्यातील रवींद्र पडवळ आणि आणि संभाजी राजे यांच्या नेतृत्वात विशाळगडाच्या पायथ्याशी दोन वेगवेगळी आंदोलने करण्यात आली. पोलीस तापासामध्ये आणखी नावे निष्पन्न होण्याची शक्यता आहे. सीसीटीव्ही आणि इतर रेकॉर्डिंग पाहून कोल्हापूर पोलीस गुन्हा दाखल करणार आहेत. 


रात्री एक वाजता शिंदे कोल्हापुरात, कायदा, सुव्यवस्थेची घेतली माहिती


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात जाऊन मध्यरात्री विशाळगडाची माहिती घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्री एक वाजता शिंदे कोल्हापुरात आले होते. त्यांनी आपल्या या दौऱ्यात कोल्हापूरच्या आयजींकडून विशाळगडाबाबत तसेच येथील परिस्थिती माहिती घेतली आहे. तसेच कोणतीही अनूचित घटना घडू नये यासाठी त्यांनी आवश्यक तो बंदोबस्त करावा, असे सांगितले आहे. त्यांनी येथील कायदा आणि सुव्यवस्थेबाबतही आयजींसोबत चर्चा केली आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे हे पंढरपूरच्या दौऱ्यावर होते. मात्र त्यांनी अचानक आपला मोर्चा वळवून रात्री एक वाजता थेट कोल्हापूरची वाट धरली आणि विशाळगडाच्या अतिक्रमाणाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा केली.


विशाळगडावर तोडफोड, दगडफेकीच्या घटना


विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याची मागणी घेऊन 14 जुलै रोजी काही शिवभक्त विशाळगडावर गेले होते. यावेळी गडावर तोडफोडीच्या आणि दगडफेकीच्या घटना घडल्या. या घटनांचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. दुसरीडे विशाळगडावरील स्थानिकांनी मारहाण झाल्याचा आरोप केला. या संपूर्ण प्रकारामुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांचा मोठा फौजफाटा असूनही या तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्याला विशेष महत्त्व आले आहे.   


इतर महत्वाच्या बातम्या