Uday Samant : स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून (Swabhimani Shetkari Sanghatana Agitation) शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी आज चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनावरुन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी टीका केली आहे. मोठमोठ्या लोकांचा शिंदे साहेबांकडे ओघ वाढला आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत नाही हे दाखवण्यासाठी आंदोलन केलं जात आहे, सरकारला बदनाम करण्यासाठी राजू शेट्टी (Raju Shetti) यांचे आंदोलन होत असल्याची टीका सामंत यांनी केली. ते आज  कोल्हापुरात (Kolhapur News) बोलत होते.  


उदय सामंत यावेळी बोलताना म्हणाले की, शिंदे साहेबांकडे येण्यासाठी मोठ मोठ्या नेत्यांचा ओघ वाढला आहे. त्यामुळे आपण त्यामध्ये नाही हे दाखवण्यासाठी आणि सरकारला बदनाम करण्यासाठी अशी आंदोलनही करावी लागत आहेत. 


कारवाई कोणावर कधी होणार हे लवकरच कळेल


उदय सामंत यांनी शिंदे गटाकडून करण्यात आलेल्या ठरावाबाबत विचारण्यात आले असता त्यांनी सांगितले की, शिस्तभंगाची कारवाई कोणावर कधी होणार हे लवकरच कळेल, तोपर्यंत ते गुपितच ठेवलेलं बरं. संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवर त्यांनी भाष्य केले. संजय राऊत यांच्याकडे आम्ही मनोरंजन म्हणून पाहतो, असा टोला त्यांनी लगावला.  त्यांनी पुढे सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो शिवसेनेच्या प्रत्येक लोकप्रतिनिधीला बंधनकारक असेल. महाविकास आघाडीमधील शिवसेना आणि आताची शिवसेना यामध्ये निवडणूक आयोगानेच बदल केले आहेत. शिवसेना म्हणजे आताची एकच शिवसेना आहे. आमची युती भाजपसोबत आहे. 


शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्यात आल्यानंतर ठाकरे गटाकडून याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर बोलताना ते म्हणाले की, याचिका दाखल केली आहे. सुनावणी सुरु आहे. ते कार्यप्रणालीवर बोलतात मात्र आम्ही बोलत नाही कारण त्या लोकशाहीतील मोठ्या संस्था आहेत. त्यांच्या अधिकारावर बोलणं योग्य नाही. बाजूने निकाल गेल्यास कौतुक करतात, विरोधात गेल्यास 2 हजार कोटींचा सौदा झाल्याचे बोलतात. 


राजू शेट्टींचा चक्काजाम कशासाठी?


दरम्यान, ऊस तोडणी मुकादमांकडून होत असलेली ऊस वाहतूकदारांची होणारी फसवणूक, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे थकित अनुदान, यासह विविध प्रश्‍ंनाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज चक्काजाम आंदोलन स्वाभिमानीकडून करण्यात येणार आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान, सदोष वीज बिल दुरुस्त करुन देणे, वीज नियामक मंडळाची प्रस्तावित 37 टक्के वीज वाढ रद्द करावी, आदी मागण्याही करण्यात येणार आहेत. 


महत्वाच्या इतर बातम्या :