Sushma Andhare : रणरणत्या उन्हामध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात श्री सेवक उष्माघाताने मृत्यूमुखी पडल्यानंतर विरोधी पक्षांनी शिंदे फडणवीस सरकारवर चौफेर हल्ला चढवला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही श्री सेवकांच्या मृत्यूनंतर तोफ डागली आहे. हिंदुत्ववादी आणि आध्यात्मिक असाल, तर या पापाची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, असे आव्हान त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. 


100 हून अधिक मृत झाले असावेत


सुषमा अंधारे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना महाराष्ट्र भूषण सोहळ्यावरून चांगलाच हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या की, अप्पासाहेबांनी साधेपणाने कार्यक्रम करण्यासाठी सूचना केल्या असतील. मात्र, त्यांनी दिलेली वेळ घेतली म्हणत त्यांच्याबद्दल भाजप चुकीची माहिती देत आहे.  मृतांचा आकडा लपवला गेला आहे. 100 हून अधिक मृत झाले असावेत


शिंदे फडणवीस यांनी खेळ केला


सुषमा अंधारे म्हणाल्या की, 16 कोटी खर्च करता तर अजून थोडे पैसे खर्च करून पेंडाल (मांडव) का उभे केले नाही? आरोग्य विभागाला अगदी शेवटच्या वेळी कार्यक्रमाची कल्पना दिली गेली. स्वतंत्र रुग्णवाहिकेचा मार्ग केला नाही. अनुयायांना मतदार समजून मतावर डोळा ठेवत कार्यक्रम घेतला गेला. शिंदे फडणवीस यांनी खेळ केला आहे. भाजपचा कोणताही नेता या लोकांपर्यंत पोहोचले नाहीत. अमित शहा यांनीही मतांचे राजकारण केले.


सर्वसामान्य लोकांचे सरकार म्हणता आणि पाच लाख देऊन हात झटकता


 मुख्यमंत्री या घटनेला जबाबदार आहेत. त्यांना कोणत्याही गोष्टीचा राजकीय इव्हेंट केल्याशिवाय जमत नाही. पाच लाख देऊन हात झटकून चालणार नाही, असे म्हणत त्यांनी मदतीवरून हल्ला चढवला. सर्वसामान्य लोकांचे सरकार म्हणता आणि पाच लाख देऊन हात झटकता, असा टोलाही त्यांनी लगावला. 


स्क्रिप्ट रायटर हे फडणवीस आहेत


सुषमा अंधारे यांनी अजित पवारांवरूनही भाष्य केले. त्या म्हणाल्या की, अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केली आहे.  यानिमित्ताने शिंदे गटाचे लोक उघडे पडले आहेत. त्यांची घडामोडीवर स्टेटमेंट पाहता शिंदे गटाचे लोक तंबाखूचा बार भरून बोलतात. महाविकास आघाडी अभेद्य आहे, आम्ही एकत्र निवडणुका लढवणार आहोत. अजितदादांची स्क्रिप्ट भाजपकडून लिहली गेली आहे. वज्रमुठ सभेला मिळणाऱ्या प्रतिसादानंतर भाजपकडून हे केले जात आहे. फडणवीस यांचे मौन सगळे सांगून जाते, स्क्रिप्ट रायटर हे फडणवीस आहेत. पुलवामा आणि इतर विषयावर प्रश्न विचारणे थांबणार नाही, मुद्दे डायव्हर्ट करणारे बालिश खेळ भाजपने बंद करावेत. असा टोलाही त्यांनी लगावला. 


इतर महत्वाच्या बातम्या