तटकरे प्रदेशाध्यक्ष, प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष, त्यांनी जबाबदारीने पाऊल उचललं तर ते 'व्हिलन' कसे ठरू शकतात? हसन मुश्रीफांकडून दोघांची जोरदार पाठराखण
"आम्ही दुःखात असताना ही मंडळी विनाकारण टीका का करत आहेत? ज्या नेत्याने मला 30-40 वर्षे सांभाळले, त्यांच्या निधनानंतर मी जे सत्य घडले तेच बोललो आहे," असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

Hasan Mushrif: दादांच्या अचानक जाण्याने मीटिंग कोणी बोलवायची? जर सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष आहेत, तर त्यांनी जबाबदारीने पाऊल उचलले तर ते 'व्हिलन' कसे ठरू शकतात? असा सवाल वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस हा आमचा स्वतंत्र पक्ष आहे, त्यामुळे त्यात इतरांनी लुडबुड करण्याची गरज नाही. "आम्ही दुःखात असताना ही मंडळी विनाकारण टीका का करत आहेत? ज्या नेत्याने मला 30-40 वर्षे सांभाळले, त्यांच्या निधनानंतर मी जे सत्य घडले तेच बोललो आहे," असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. अपघातानंतर त्यांच्या कुटुंबीयांची इच्छा होती की लवकरात लवकर सुनेत्रा वहिनींचा शपथविधी व्हावा. पवार घराणे हे पुरोगामी असल्याने तिसऱ्या दिवसाचे विधी आटोपल्यानंतर चौथ्या दिवशी त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
विलीनीकरणाच्या चर्चेवर काय म्हणाले?
हसन मुश्रीफ यांनी सांगितले की, विलीनीकरणाच्या ज्या चर्चा सुरू आहेत, त्या चर्चेमध्ये फक्त अजित दादा होते, आम्ही कोणीही प्रमुख माणसे नव्हतो असा आमचा दावा आहे. जर सुनेत्रा वहिनी, कुटुंबीय आणि राष्ट्रवादीचे सर्व नेते एकत्रीकरणाच्या मताचे असतील, तर त्यामध्ये कोणतीही अडचण येण्याचे कारण नाही. पक्ष जो निर्णय घेईल, तीच माझी भूमिका असेल. अपघाताची चौकशीबद्दल ते म्हणाले की, मुख्यमंत्री आणि केंद्र सरकारने चौकशी सुरू केली आहे. त्यातून जो 'ब्लॅक बॉक्स' सापडला आहे, त्यातून चित्र स्पष्ट होईल. जे लोक यावर शंका उपस्थित करत आहेत, त्यांच्यासाठी चौकशी हाच एकमेव उपाय आहे.
सर्व मतदारांना आणि कार्यकर्त्यांना मोठा चटका बसला
अजित दादांच्या जाण्याने सर्व मतदारांना आणि कार्यकर्त्यांना मोठा चटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पश्चिम महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे विस्तारलेला आहे आणि या निवडणुकीत लोक अजित दादांबद्दल निश्चितपणे सहानुभूती दाखवतील असा विश्वास असल्याचे मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. आज 10 वर्षांनंतर मतदान होत असल्याने मतदारांमध्ये आणि उमेदवारांमध्ये प्रचंड उत्साह आहे. या निमित्ताने जिल्हा परिषदमध्ये पुन्हा एकदा लोकशाही सुरू होणार ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
























