Sumangalam Lokotsav : सिद्धगिरी मठावर होत असलेल्या सुमंगलम लोकोत्सवाची (kaneri math) तयारी जोरदार सुरु आहे. शासकीय पातळीवरूनही पाठबळ लाभल्याने लोकोत्सवाच्या पूर्वतयारीने वेग पकडला आहे. सात दिवस चालणाऱ्या या महोत्सवासाठी  देश विदेशातील भाविक, पाहुण्यांची मांदियाळी असणार आहे. त्यांची वाटचाल, संघर्षमय वाटचाल या महोत्सवात उलघडली जाणार आहे. सुमंगलम महोत्सवात 28 राज्यांतील भाविकांसह तब्बल 50 देशांतील परदेशी पाहुणे, एक लाख स्क्वेअर फुटाचा भव्य मंडप, चार हजार वैदूंचे संमेलन 20 फेब्रुवारीपासून मठावर होत असलेल्या पंचमहाभूत सुमंगल लोकमहोत्सवाची वैशिष्ट्ये असतील. लोकोत्सवातून पर्यावरण, शेती, अध्यात्म, सामाजिक, आर्थिक, राजकीय, उद्योग, शिक्षण, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक यासह सर्व क्षेत्रांतील दिग्गज व्यक्तींची सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवात उपस्थिती असेल. अनेकांच्या संघर्षमय आणि यशस्वी वाटचालीची कहाणी या लोकोत्सवात उलघडणार आहे. 


या मान्यवरांची उपस्थिती असणार 


यामध्ये पाणीतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा, बाबा सिचेवाल, संजयसिंह सज्जन, 58 गावांतील दुष्काळ हटविणारे लक्ष्मण सिंह, पर्यटनतज्ज्ञ कानसिंह निर्वाण, सेंद्रिय शेती करणारे किसनसिंह जाखड, सुप्रसिद्ध उद्योजक श्रीधर व्यंभू, हणमंतराव गायकवाड, पोपटराव पवार, विजय संकेश्वर, मिलेटमॅन डॉ. कादर, स्वामी, त्याग वल्लभ दासी, माधवप्रिय दासजी, केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, मंत्री अनुराग ठाकूर, संशोधक गुरुराज करजगी, खासदार अमोल कोल्हे, तेजस्वी सूर्या, अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांची उपस्थिती राहाणार आहे.


अनेक गोष्टींचे मार्गदर्शन होणार 


या महोत्सवातून पर्यावरण जागृती, व्यापार उद्योगाची वृद्धी, सेंद्रिय शेतीचा प्रसार, यासह नव्या पिढीला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी रोज दोन सत्रांत अनेक मान्यवरांचा मुक्त संवाद होणार आहे. सेंद्रिय शेती कशी करावी, नवनवे स्टार्टअप कोणते आहेत, व्यवसाय सुरू करताना काय काळजी घ्यावी, यासह अनेक गोष्टींचे मार्गदर्शन होणार आहे. या लोकोत्सवात हजारावर साधूसंतांचा सहवास लाभणार आहे. यातून विज्ञान आणि अध्यात्माची सांगड कशी घातली जाईल, याची माहिती मिळेल. पाचशे कुलगुरू शिक्षण क्षेत्रातील नव्या संशोधनावर प्रकाश टाकतील. दहा हजारांवर उद्योजक आपल्या यशस्वी वाटचालीचा लेखाजोखा मांडतील. चार हजारांवर वैदू औषधी वनस्पतींची माहिती देतील. जगभरातून येणारे परदेशी पाहुणेही प्रगतीचा मार्ग दाखविणार आहेत.


देशी जनावरांचं भव्य प्रदर्शन


लोकोत्सवात देशी प्रजातींच्या गाय, म्हशी, बकरी, अश्व, कुत्रे आणि मांजर यांचे अनोखे प्रदर्शनही भरवण्यात येणार आहे. त्यामुळे देशी जातीच्या प्रजातींचे संगोपन आणि संवर्धनाची व्याप्ती वाढण्यास मदत होणार आहे. या ठिकाणी गाढवांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. गाढव हा अतिशय उपयुक्त प्राणी असूनही तो दुर्मिळ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे प्रदर्शन होत आहे. 21 ते 23 फेब्रुवारी या काळात हे प्रदर्शन असेल.


इतर महत्वाच्या बातम्या