Jaysingpur : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर (Jaysingpur) शहराला लागून गट नंबर 343 मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून भटक्या समाजाचे नागरिक वास्तव्यास आहेत. या जागेवर डोळा अनेकांचा असल्याने त्या परिसरातील झोपडपट्टीतील नागरिकांना या जागेवरून परागंदा करण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत. हा प्रकार सुरु असतानाच सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास झोपडपट्ट्या पेटवून देण्याचा प्रयत्न झाला. अज्ञातांनी झोपडपट्ट्या पेटवून दिल्याने 2 झोपड्या जळून खाक झाल्या. आग तातडीने विझवल्याने इतर झोपड्या वाचल्या गेल्या. 


झोपडपट्ट्या पेटवून दिल्यानंतर कोणतीही जिवितहानी झालेली नसली, तरी लमान वसाहतीमधील परिसर भयभित झाला आहे. महावितरणला वीज कनेक्शन देण्यासाठी सर्व सोपस्कार पार पाडूनही डोळा असलेल्या धनदांडग्या बिल्डराच्या दबावामुळे वीज कनेक्शन देण्याचे काम थांबवण्यात आले होते. त्यामुळे लमान वसाहतीमधील महिलांनी आरोग्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर (rajendra patil yadravkar) यांच्याकडे व्यथा मांडून वीज कनेक्शन देण्याची मागणी केली होती. त्यानंतर यड्रावकरांनी तातडीने तहसिलदार अपर्णा मोरे-धुमाळ व महावितरणचे अधिकारी वैभव गोंदील यांना वीज कनेक्शन देण्याबाबत आदेश दिले होते.
 
लमान वसाहतीमधील नागरिकांना घालवण्यासाठी दंडेलशाहीचा प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे. आता ही मजल झोपडपट्ट्या पेटवून देण्यापर्यंत गेल्याने पोलिसांनी तत्काळ गोरगरिबांच्या जीवावर उठणाऱ्या मुजोर प्रवृत्तींवर कारवाई करावी, अशी मागणी लमान परिसरातील नागरिक करत आहेत. दरम्यान, शिरोळ पोलिसांनी अद्याप यासंदर्भात कोणतीही तक्रार आलेली नाही. तक्रार दाखल झाल्यास योग्य तो तपास केला जाईल असे म्हटले आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या