Radhakrishna Vikhe Patil on Gokul: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थातच 'गोकुळ'च्या लेखापरीक्षणावरुन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोल्हापूर दौऱ्यात केलेल्या थेट टिप्पणीमुळे गोकुळमधील सत्ताधाऱ्यांच्या अडचणी वाढणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. गोकुळ दूध संघाच्या कारभारामध्ये अनियमितता आढळली आहे, त्याबाबत खुलासा करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. 


अनियमितता संदर्भातील अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. अहवाल आल्यानंतर कारवाई करू, असा इशाराच राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोल्हापूर दौऱ्यात (Kolhapur News) करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'गोकुळ'बाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार लेखापरीक्षणाचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. या अहवालात अनियमितता दिसून आली आहे. यासंदर्भात गोकुळ प्रशासनाकडून खुलासा मागवण्यात आला आहे. मात्र, अंतिम अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही, पण प्राथमिक अहवालात अनियमितता स्पष्ट झाल्यास गोकुळवर कारवाई केली जाणार आहे.


मागील अडीच वर्षात राज्य ठप्प 


विखे पाटील अन्य मुद्यांवर बोलताना सांगितले की, मागील अडीच वर्षात राज्य ठप्प होते. मुख्यमंत्री फक्त फेसबुकवर दिसत होते. मागील मुख्यमंत्र्यांनी फक्त विमा कंपन्यांवर मोर्चे काढले. आम्ही एक रुपयात विमा दिला, त्यासाठी कोणत्या अटी घातल्या नाहीत. औषधोपचारासाठी मदत करणारे हे देशातील एकमेव राज्य आहे. अडीच वर्षात 25 वर्षे राज्य मागे गेले. मंत्रिमंडळ विस्तार लवकर होईल अशी अपेक्षा असल्याचे पाटील म्हणाले. तुकडे बंदी आणि गुंठेवारी हे दोन्ही विषयांमध्ये साम्य आहे. जमिन दलालानी आणि आमच्या विभागातील अधिकाऱ्यांनी सहभाग घेत यात चुकीचे काम केलं आहे. दस्त नोंदणीमध्ये अनियमितताबाबत चौवकशीचे आदेश दिले आहेत. 


शेट्टी उसाचे आंदोलन सोडून महसूलकडे आले 


राजू शेट्टी यांनी रेटकार्ड जाहीर करताना बदल्यांवरून तोफ डागली होती. यावरून विखे पाटील यांनी खोचक टिप्पणी करताना शेट्टी उसाचे आंदोलन सोडून महसूलकडे आले असल्याची प्रतिक्रिया दिली. बदलीत पैसे घेतले असतील तर ते त्यांनी दाखवून द्यावे, असे आव्हान दिले. विखे पाटील यांनी राष्ट्रवादीला टोला लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था वेगळी आहे. हा पक्ष नेहमी तळ्यात मळ्यात राहिला आहे. त्यांच्या दिवसरात्र गाठीभेटी सुरू असतात. आपली बार्गेनिंग पाॅवर वाढवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचे नेते करत असल्याची टीका त्यांनी केली. 


इतर महत्वाच्या बातम्या