Kolhapur Airport : कोल्हापूर-मुंबई मार्गावरील स्टार एअरलाईन्सची विमानसेवा येत्या 5 एप्रिलपासून आठवड्यातून चार दिवस उपलब्ध होणार आहे. मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शनिवार या चार दिवशी सेवा उपलब्ध होणार आहे. यापूर्वीच्या सेवेमध्ये आता एक दिवस वाढवण्यात आला आहे. कोल्हापूर-मुंबई बंद पडलेली विमानसेवा स्टार एअरच्यावतीने 4 मार्च 2022 रोजी सुरू झाली होती. सध्या 50 आसन क्षमतेचे विमान मंगळवार गुरुवार व शनिवार असे आठवड्यातून तीन दिवस सेवा देत आहे. आता 5 एप्रिल पासून ही सेवा आठवड्यातून चार दिवस सुरू होणार आहे. 


मुंबई विमानतळावरून सकाळी साडेदहा वाजता विमानाचे टेक ऑफ होईल ते कोल्हापुरात साडेअकरा वाजता येईल. त्यानतंर 11 वाजून 55 मिनिटांनी ते मुंबईसाठी टेकऑफ होईल. दुपारी12 वाजून 55 मिनिटांनी मुंबईत पोहोचेल. स्टार एअरची एक मार्च 2023 रोजी डीजेसीएच्या निर्देशना निर्देशानुसार आयएफआर चाचणी घेण्यात आली आहे. चाचणी झाली नसल्याने कमी दृश्यमानतेत (व्हिजिबिलिटी) मोठ्या विमानाचे लँडिंग होऊ शकत नव्हते. मात्र, आता चाचणी झाल्याने कंपनीला मोठा दिलासा मिळाला आहे.  


विमानतळावरील कामे पूर्ण होण्यासाठी ऑक्टोबर उजाडणार 


दरम्यान, कोल्हापूर विमानतळ विकास आणि विस्तारीकरणाची सध्या एकूण 280 कोटींची कामे सुरू आहेत. ही सर्व कामे ऑक्टोबरअखेर पूर्ण करण्यात येतील. कोल्हापुरातून देशातील इतर नव्या शहरांमध्ये विमानसेवा सुरू केली जाईल, अशी ग्वाही केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी तीन दिवसांपूर्वी कोल्हापूर दौऱ्यावर दिली. दुसरीकडे, कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी सुरु असलेल्या भूमी संपादनाविरोधात 40 भूखंडधारकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी भूमी संपादन कायद्यातील तरतुदीनुसार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना तुटपुंजी रक्कम दिली जात असल्याच्या याचिकेवर उच्च न्यायालयात न्यायाधीश रमेश धनुका आणि न्यायाधीश गौरी गोडसे यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाला नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, राज्य सरकारलाही तीन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेशही दिले आहेत.


कोल्हापूर विमानतळावरुन 4 लाख 38 हजार जणांचा प्रवास  


दरम्यान, कोल्हापूर विमानतळ प्रगतीपथावरुन कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली साताऱ्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात लाभ होत आहे. गेली पाच वर्षे आणि दोन महिन्यात सुमारे 4 लाख 38 हजार 277 जणांनी कोल्हापूर विमानतळावरुन हवाई प्रवास केला आहे. यामध्ये सर्वाधिक प्रवास कोल्हापूर ते हैदराबाद या विमानसेवेचा 54 हजार 330 जणांनी लाभ घेतला आहे. सध्या बंगळुरु, हैदराबाद, तिरुपती, अहमदाबाद येथे विमानसेवा सुरु असून याचा लाभ प्रवाशांना होत आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील युवक, युवती मोठ्या प्रमाणात स्थायिक झाले आहेत. त्यांना कोल्हापूर विमानतळ सोयीचे झाले असून यामुळे त्यांच्या वेळेची बचत झाली आहे. लवकरच अन्य शहरांशी जोडणारी विमानसेवाही सुरु होणार आहे.