कोल्हापूर : सतेज पाटील यांचा निवडणूक निकालानंतर भ्रमनिरास होईल, त्यांना मंत्रिपद मिळालं नसल्याचं दुःख असल्याची खोचक टीका वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचा मेळावा पार पडल्यानंतर सतेज पाटील यांनी जिल्ह्यात महाविकास आघाडी सरस राहिल असे म्हटले होते. यानंतर आता मुश्रीफ यांनी टोलेबाजी केली आहे. 


'सावज' आता माझ्या टप्प्यात आलं आहे


हसन मुश्रीफ म्हणाले की, 57 पैकी 47 जागा पश्चिम महाराष्ट्र मध्ये महायुतीला मिळतील. गेली 35 ते 40 वर्षे मी शरद पवार यांचा मी कार्यकर्ता आहे. शरद पवार यांच्या सगळ्या सुखदुःखात मी सहभागी राहिलो आहे. मी अग्निपरीक्षा दिली आहे, मी गुरुदक्षिणा देखील दिली आहे. त्यामुळे सुप्रियाताई यांनी हे सगळं समजून घेणे गरजेचं आहे. हे सगळं करणाऱ्या व्यक्तीला समोर करून असं बोलणं चुकीचं आहे. राजकारणात सावज म्हणजे विरोधक असतात आता सावज माझ्या टप्प्यात आला आहे. 


जागेचा वाद फारसा राहिला नाही


हसन मुश्रीफ जागावाटपावरून म्हणाले की, महायुतीचे तिन्ही नेते अमित शाह यांच्यासोबत बसलेले आहेत. वाटाघाटी पूर्ण झालेल्या आहेत, जागेचा वाद फारसा राहिला नाही. जे इच्छुक आहेत ते आता कामाला लागले आहेत. महायुतीमधील तिन्ही पक्षाला सन्मानपूर्वक जागा दिल्या जाणार आहेत. महाराष्ट्र राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येईल. महायुतीमध्ये लढतो त्यावेळी सगळ्यांनी मिळून एकत्र काम करायचे असते. महायुतीमधील तिन्ही पक्षाच्या चिन्हांचा एकत्र काम केलं पाहिजे.


फडणवीस कोणत्या आधारे बोलले हे मला माहिती नाही


ते पुढे म्हणाले की, एकमेकांच्या जागा पाडून काम पूर्ण होणार नाही, एकमेकांच्या जागा निवडून आणणे हे गरजेचं आहे. लोकसभेला आमची मते जास्त मिळाली नाहीत हे फडणवीस कोणत्या आधारे बोलले हे मला माहिती नाही. पण विधानसभा निवडणुकीमध्ये तिन्ही पक्ष जोरदारपणे कामगिरी करतील. 


इतर महत्वाच्या बातम्या