बेळगाव : सौंदत्ती तालुक्यातील चचडी गावातील पुरुष आणि तरुण मंडळी दारूच्या आहारी गेल्यामुळे संपूर्ण गावाचं वातावरण बिघडलं असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, इतर गावातील लोक आता 'दारू दुकान बंद करा, मगच मुलगी देतो' असं स्पष्ट सांगत असल्याने अनेकांची लग्नंही होत नाहीत. त्यामुळे आता गावातील महिलांचा संताप अनावर झाल्याचं दिसून आलं.
याच पार्श्वभूमीवर चचडी गावातील महिलांनी मोठ्या संख्येने एकत्र येत गावातील दारू दुकान तात्काळ बंद करावी आणि इतर दुकानांमधून सुरू असलेली बेकायदेशीर मद्यविक्री थांबवावी, अशी जोरदार मागणी केली आहे.
Liquor Ban Demand : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करत गावातील परिस्थितीची गंभीरता मांडली. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदन स्वीकारत या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल, असं आश्वासन दिलं.
Alcohol Addiction Impact : दारूमुळे कुटुंब उद्ध्वस्त
गावातील महिलांनी सांगितलं की, पुरुष आणि तरुण सायंकाळ झाली की दारू पिण्यासाठी, पार्टी करण्यासाठी बाहेर पडतात. इतकंच नाही तर त्यांना घरातील धान्य, वस्तू विकूनही दारू पिण्याची सवय लागली आहे. दारू पिऊन घरी आल्यावर महिलांना मारहाण केली जाते, भांडणं होतात आणि घरात तणावाचं वातावरण निर्माण होतं.
Women Burden Increase : महिलांवर वाढला ताण
पुरुष दारूच्या आहारी गेल्यामुळे ते शेतात जात नाहीत, तसेच कामालाही जात नाहीत. त्यामुळे शेतातील सगळी कामं करण्याची वेळ महिलांवर आली आहे. घर आणि शेती दोन्ही सांभाळताना महिलांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
Illegal Liquor Sale : बेकायदेशीर विक्रीमुळे वाढलं संकट
गावात सरकारी दारू दुकान सुरू झाल्यापासून आणि इतर दुकानांतूनही बेकायदेशीर मद्यविक्री वाढल्यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होण्याचा धोका वाढला आहे, असंही महिलांनी निवेदनात नमूद केलं.
Village Social Impact : लग्नासाठी मुली नाकारल्या
दारूमुळे गावाची प्रतिमा खराब झाली असून बाहेरील गावांतील लोक आता आपल्या मुली या गावात देण्यास नकार देत आहेत. गावातील दारू बंद करा, मगच आम्ही मुली देतो असा निरोप बाहेरच्या गावातील लोकांकडून येतो. त्यामुळे अनेक तरुणांची लग्नंही होत नसल्याचं चित्र आहे. याचा सामाजिक स्तरावरही गावाला मोठा फटका बसत असल्याचं महिलांनी सांगितलं.
ही बातमी वाचा :
