कोल्हापूर : चार दिवसांपूर्वी (3 जुलै) रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील कोपार्डेमध्ये विजेच्या धक्क्याने दोन सख्ख्या भावांचा करुण अंत झाला होता. पोटच्या लेकरांच्या आकस्मिक धक्क्यानंतर अवघ्या पाचव्या दिवशी आईनं देखील घेतला अखेरचा श्वास घेतल्याची हृदयद्रावक घटना घडली.


आईच्या मृत्यूने संपूर्ण पाटील कुटुंबच उद्ध्वस्त


नंदाताई कृष्णा पाटील असं मृत आईचं नाव आहे. शाॅक लागून 3 जुलै रोजी सुहास आणि स्वप्नील पाटील या दोन तरुण सख्ख्या भावांचा मृत्यू झाला होता. दोन्ही मुलांच्या आणि आता आईच्या मृत्यूने संपूर्ण पाटील कुटुंबच उद्ध्वस्त झालं आहे. नंदाताई पाटील यांच्या पश्चात पती कृष्णा पाटील, सून व एक वर्षाची नात असा परिवार आहे.


आपल्या दोन्ही मुलांचा आकस्मित मृत्यू मृत नंदा पाटील यांना सहन झाला नाही. आज रविवारी रोजी दोन्ही मुलांचे रक्षाविसर्जन होते. तत्पूर्वी शनिवारी रात्री अकरा वाजता आई नंदा यांना तीव्र ह्दयविकाराचा झटका आला. त्यांना दवाखान्यात दाखल केले, मात्र त्यातच त्यांची मध्यरात्री प्राणज्योत मालवली. 


वीजेच्या धक्क्याने दोन भावांचा अंत 


3 जुलै रोजी कोपार्डेत कडवी नदीजवळ असणाऱ्या शेतात सुहास कृष्णा पाटील (वय 36) व स्वप्नील कृष्णा पाटील (वय 31) हे दोघे भाऊ भात रोप लावण केल्यानंतर तणनाशक मारण्यासाठी शेतात गेले होते. तणनाशक मारत असताना सुहासला वीजेच्या तारेचा जोरदार धक्का बसल्याने शेतात पडला. यावेळी दादा काय झालं असे म्हणत स्वप्नील जवळ गेला असता त्यालाही वीजेचा धक्का लागला. यामध्ये दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. दोन्ही मुले अजून घरी का आली नाहीत म्हणून त्यांचे वडिल कृष्णा पाटील तेथे गेले होते. दोन्ही मुलांना पाहून वडिल हबकून गेले. त्यांनी आरडाओरड केली असता गावातील लोकांनी धाव घेऊन त्यांना आधार दिला होता. 


इतर महत्वाच्या बातम्या