Jammu Kashmir Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला (Jammu Kashmir Pahalgam Terror Attack) केला. या हल्ल्यात आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 13 जण जखमी झाले आहेत.पहलगाममध्ये पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी देशीविदेशी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केल्याची माहिती आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पन्नासहून अधिक गोळ्यांची फैर झाडली. या हल्ल्यानंतर काल रात्रीच गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) श्रीनगरसाठी रवाना झाले.
अमित शाह यांनी नायब राज्यपालांसह अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. तसेच आज अमित शाह पहलगामची पाहणी करणार असल्याची माहिती देखील मिळत आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. पहलगाम हल्ला 8 ते 10 दहशतवाद्यांकडून झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच दहशतवाद्यांना 2 ते 3 स्थानिकांची मदत झाल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली.
स्थानिकांनी रेकी करून मदत केल्याची माहिती-
दहशतवाद्यांपैकी 5 ते 7 जण पाकिस्तानचे असल्याची माहिती समोर आली आहे. कोणाला शंका येऊ नये म्हणून स्थानिक भाषेत संवाद साधला जात होता. पोलिसांच्या वेशातल्या स्थानिकांनी दहशतवाद्यांना मदत केल्याची माहिती समोर आली. तसेच पोलिसांच्या वेशातल्या स्थानिकांनी रेकी करून मदत केल्याची माहिती देखील मिळत आहे. त्यामुळे केंद्र सरकार आता कोणतं पाऊल उचलणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
टीआरएफ या दहशतवादी संघटनेने स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी-
दहशतवाद्यांनी पर्यटकांची नावं आणि धर्म विचारून गोळ्या झाडल्याची माहिती आहे. टीआरएफ या दहशतवादी संघटनेने या भ्याड हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलीय. मार्चमध्ये झालेल्या बर्फवृष्टीनंतर शेकडोंच्या संख्येनं पर्यटक काश्मिरमध्ये येत असतात. यंदाही पर्यटन वाढल्यानं सर्वसामान्य काश्मिरी नागरिक आनंदात होते. पण बऱ्याच काळानंतर काश्मिरमध्ये पहिल्यांदाच पर्यटकांना टार्गेट करण्यात आलं. जम्मू-काश्मीर पोलीस आणि भारतीय लष्कर घटनास्थळी दाखल झाले असून, परिसराची नाकाबंदी करून, सर्च ऑपरेशन राबवण्यात येतं आहे. पर्यटकांवर झालेल्या गोळीबारानंतर काश्मीरमधील पर्यटक पुन्हा आपापल्या राज्यांमध्ये परतू लागले आहेत.