Manoj Jarange Patil : सगेसोयरे म्हणजे नेमके कोण? मनोज जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटीतून व्याख्या सांगितली!
Manoj Jarange Patil : सरकार आडमुठेपणाच्या भूमिकेत जाणार असेल तर ही देशासाठी आणि राज्यासाठी लाजिरवाणी गोष्ट असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी 29 ऑगस्टला चलो मुंबईचा नारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी आज अंतरवाली सराटी येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सगेसोयरे म्हणजे नेमके कोण? याबाबत व्याख्याच सांगितली आहे.
मनोज जरांगे पाटील पत्रकार परिषदेत म्हणाले की, 29 ऑगस्टला मुंबईला जातोय. अंतरवालीवरून सकाळी 27 ला सकाळी 10 वाजता निघणार आहोत. अंतरवाली - पैठण -शेवगाव (अहिल्यानगर), कल्याण फाटा -आळे फाटा, शिवनेरी (जुन्नर मुक्कामी) 28 ला खेड मार्गे चाकण, लोणावळा, वाशी चेंबूर..28 ला रात्री आझाद मैदानावर पोहोणार आहोत. 29 ला सकाळी 10 वाजता आझाद मैदानावर आंदोलन करणार आहोत. सरकार आणि फडणवीस यांना सांगतो की, आम्हाला कोणताही एक रस्ता द्या. जेणेकरून आझाद मैदानावर जाता येईल. आम्हाला ट्रॅफिक जाम करायचे नाही, असे त्यांनी म्हटले.
सगेसोयरेची अधिसूचना तुम्ही काढली
मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, आमची प्रमुख मागणी मराठा कुणबी एकच आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे. त्या शिवाय मुंबई सोडणार नाही. हैदराबाद गझेटियर लागू करा. 13 महिन्यापासून त्यांचा अभ्यासच सुरू आहे. आम्हाला सातारा, बाँबे गॅझेटियर लागू करून हवे. सरकारने मराठ्यांचा विषय समजून घ्यावा. 10 टक्के दिलेलं आरक्षण कधीही जाऊ शकते, आम्हाला आमची हक्काची जमीन द्या. भाड्याने घर देऊ नका. आमच्या दीडशे वर्षापूर्वीच्या नोंदी आहेत. सगेसोयरेची अधिसूचना तुम्ही काढली. तिची अंमलबजावणी नाही. तुम्ही त्यावेळेस सांगितले होते की, आम्ही 2012 च्या कायद्यात दुरुस्ती केली. आम्हाला सहा महिन्यासाठी अंमलबजावणीला वेळ द्या. हरकती मागवून त्याच्यावर छाननी करतो. आता छाननी करून आणि आम्ही दिलेला वेळ मिळून दीड वर्ष झालेले आहे. इतका कोणता समाज थांबू शकत नाही. इतका संयमाने माझ्या समाजाने हा विषय घेतलेला आहे.
मनोज जरांगेंनी सांगितली सगेसोयरेची व्याख्या
सगेसोयरेच्या अधिसूचनेची व्याख्या देखील आम्ही त्या त्या वेळेस सांगितलेली आहे. मी आजही सांगतो परंपरेनुसार पिढ्यापिढ्या पार लग्नाच्या सोयरीक जुळतात ते सोयरे. तर ते का घ्यायचे याचे सुद्धा तीन चार परिच्छेद केलेले आहे. आमचे सांगितलेले शब्द घ्या. प्रत्येक वेळेस तुम्ही ते टाळत आहात. सगेसोयरे का घ्यायचे तर ज्याची कुणबी नोंद सापडली ते सगेसोयरे म्हणून घ्यायचे. 1967 ला ओबीसींना आरक्षण दिले गेले. पोट जात, उपजात म्हणून याच्या आधी 180 च्या आसपास जाती होत्या. मुद्दाम देवेंद्र फडणवीस यांना मी सांगत आहे की, आता आंदोलन खूप पुढे गेलेले आहे. आता आम्ही निघण्याच्या तयारीत आहोत. शेवटचे सांगत आहोत. अजून तुमच्या हातात दोन दिवस आहेत. तुम्ही महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातले मराठे वेठीस धरू नयेत. कारण तुम्ही सरकार आहात. सरकारने राज्य अस्थिर करू नये. राज्याच्या प्रमुखाला राज्य अस्थिर करण्याचा अधिकार नाही. सरकार आडमुठेपणाच्या भूमिकेत जाणार असेल तर ही देशासाठी आणि राज्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे.
ज्याची कुणबी नोंद निघाली, ते सगळे सगेसोयरे म्हणून पोटजात, उपजात म्हणून घ्या. या अगोदर 1967 ला 180 जाती होत्या. त्यावेळेस ओबीसी समाजाचे सगेसोयरे तुम्ही आरक्षणात घेतले ते आमच्या भाषेत सगळे सोयरेच आहेत. त्याला फक्त तुम्ही कायदेशीर नाव चेंज केले आहेत. पहिल्यांदा 180 जाती होत्या. आता साडेतीनशे ते चारशे जाती झालेल्या आहेत. सोयीनुसार सगेसोयरे आरक्षणात घेतले आहेत. फक्त त्यांचे नाव बदलले आहे. सगेसोयरेला पोटजात, उपजात असे नाव देण्यात आले. त्यांनी त्यावेळेस फक्त सगेसोयरे शब्द वापरला नाही. तसंच ज्यांची कुणबी नोंद सापडली मग मराठ्याची पोटजात कुणबी होत नाही का फडणवीस साहेब? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
आणखी वाचा























