अमेरिका अन् इराण युद्धाचा फटका, जळगावातील केळी उत्पादक शेतकरी चिंतेत; निर्यात रखडणार, दररोज किती टन?
रमजानचा महिना सुरू असल्याने आखाती देशांबरोबरच मुस्लिम देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर केळीची जळगाव जिल्ह्यातून निर्यात होत असते.

जळगाव: अमेरिका व इराण यांच्यातील युद्धामुळे जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची भीती निर्माण झाली आहे. युद्धामुळे केळीची निर्यात ठप्प झाल्याने जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक संकटात सापडले आहेत. जळगाव जिल्ह्यातून सध्या देखील दररोज सुमारे 12 कंटेनर केळी आखाती देशांकडे पाठवली जात होती. रमजानचा महिना सुरू असल्याने आखाती देशात केळीसह इतरही फळांना मोठी मागणी असून युद्धजन्य परस्थितीमुळे या फळबागा उत्पादक शेतकऱ्यांना (Farmers) मोठा फटका बसला जाण्याची शक्यता आहे.
इराण, इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरू झालेल्या युद्धामुळे जळगाव जिल्ह्यातून निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. रमजानचा महिना सुरू असल्याने आखाती देशांबरोबरच मुस्लिम देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर केळीची जळगाव जिल्ह्यातून निर्यात होत असते. एकीकडे केळीची निर्यात ठप्प झाली असून दुसरीकडे केळीच्या दरात देखील मोठी घट झाल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. युद्धापूर्वी केळीचा दर 2500 रुपये क्विंटल एवढा होता. मात्र, त्यात आता घट झाल्याने केवळ 1500 रुपये क्विंटल एवढाच दर केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळत आहे. भारत देशाने यात तोडगा काढून केळी उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्याची विनंती शेतकऱ्यांनी केली आहे.
कोल्हापुरातील 150 भारतीय अडकले
आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे दीडशे नागरिक विविध ठिकाणी अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आखाती देशांमध्ये अडकलेल्या सुमारे 150 कोल्हापूरकरांपैकी 130 जणांची अधिकृत माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला प्राप्त झाली आहे. या सर्व नागरिकांशी प्रशासन सातत्याने संपर्कात असून ते सुरक्षित असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेता संबंधित नागरिकांशी संपर्क साधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. राज्य शासनाकडून मिळणाऱ्या सर्व सूचनांची तंतोतंत अंमलबजावणी केली जात असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
अडकलेले पर्यटक चिंतेत
अचानकपणे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानं दुबईतील विमानांची उड्डाण बंद करण्यात आली आहेत. परिणामी पुण्यातील आणखी चाळीस पर्यटक दुबईत अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे. दुबई प्रशासन सतर्क असून त्यांनी सर्वोतोपरी उपाययोजना राबवलेल्या आहेत. मात्र, आता भारतात येण्याची ओढ लागल्याचं अन् दिवसेंदिवस चिंता वाढत असल्याचं भारतीय पर्यटक सांगत आहेत. खरं तर आज हे सर्व पर्यटक भारतात परतणार होते, मात्र दुबईतील परिस्थिती पाहता आणखी किती दिवस ते अडकून राहतील. याचं उत्तर सध्या त्यांना मिळत नाही.
























