Jalgaon News : जळगाव (Jalgaon) जिल्ह्याच्या रावेर तालुक्यातील ऐनपूर इथे वर्षानुवर्षे बारागाड्या ओढण्याची परंपरा आहे. यंदाही परंपरा कायम ठेऊन ऐनपूर इथल्या बारीघाट इथे बारागाड्या ओढण्यात आल्या. परंतु यात बारागाड्याचा ताबा सुटल्याने एकाचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दिनकर रामकृष्ण कोळी (वय 60 वर्षे) असं मृत व्यक्तीचे नाव आहे.
बारागाड्यांचा ताबा सुटला; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
अक्षय्य तृतीयेच्या (Akshaya Tritiya 2023) दुसऱ्या दिवशी हा उत्सव साजरा करण्यात येत असतो. त्यानुसार रविवारी (23 एप्रिल) ऐनपूर येथील बारीघाट इथे या बारागाड्या ओढण्यात आल्या. बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी पुरुषांप्रमाणे महिलांनाही मोठी गर्दी केली होती. मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात बारागाड्या ओढण्यास सुरुवात झाली. प्रेक्षक उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत होते. परंतु बारागाड्या ओढत असताना गाड्यांचा ताबा सुटल्याने प्रेक्षकांमधून दिनकर रामकृष्ण कोळी यांच्यासह भगतीन मंगलाबाई प्रकाश भील, सुभाष भील, ईश्वर भील, नामदेव भील, किशोर हरी, मोहन एकनाथ महाजन, तर बगल्यांमध्ये सुनील राजाराम महाजन तसेच ज्यु ओढणारे नारायण शामराव महाजन, ईश्वर रुपा भील हे जखमी झाले आहेत.
दरम्यान अपघातात दिनकर रामकृष्ण कोळी यांना जास्त मार लागल्याने त्यांना रावेर ग्रामीण रुग्णालयात तात्काळ दाखल केले असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर इतर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
गेल्या वर्षीही बारागाड्या ओढण्याच्या कार्यक्रमात दुर्घटना
मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात जळगावातीलच एरंडोल तालुक्यातील तळई गावात बारागाड्या ओढण्याच्या कार्यक्रमात अशाच प्रकारची घटना घडली होती. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला होता. चंपाषष्ठीनिमित्त आयोजित बारागाड्या ओढण्याच्या कार्यक्रमात गर्दीमध्ये पळताना पायात पाय अडकल्याने तरुण बारागाड्यांच्या समोर आला. यावेळी त्याच्या पोटावरुन चाक गेल्याने गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु होते. परंतु उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. राहुल पंडीत पाटील (वय 30 वर्षे रा. तळई ता. एरंडोल) असं मृत तरुणाचं नाव होतं. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. राहुल पाटील हा एरंडोल तालुक्यातील निपाणे येथील जिल्हा बँकेच्या शाखेत लिपिक म्हणून नोकरी करत होता. राहुलच्या पश्चात वडील पंडित मिठाराम पाटील, आई सरला, पत्नी अश्विनी तर लहान भाऊ महेंद्र आणि मुलगा असा परिवार आहे.