लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या धक्कादायक वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. तुमच्या मुलांचा सांभाळ आता सरकार करणार का? असा सवाल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. लखनऊमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांच्या अशा बेजबाबदार वक्तव्यामुळे त्यांच्यावर चहूबाजूंनी टीकेची झोड उठली आहे.


योगी आदित्यनाथ म्हणाले की, ''तुम्ही सर्वांनी आपली जबाबदारी सरकारवर टाकली आहे. असं करण्याने आपण सर्व जबाबदारीतून मुक्त झालो, असं तुम्हाला वाटत असेल. पण मला कधी कधी वाटतं की, एक वेळ अशी येईल की, आपली मुलं एक-दोन वर्षांची झाल्यानंतर सरकारच्या भरवश्यावर सोडून देतील. सरकारनं त्यांचं पालन पोषण करावं हिच त्यांची अपेक्षा असेल.''

गोरखपूरच्या बीआरडी रूग्णालयात ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत 386 मुलांचा मृत्यू झाला. मात्र, प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे मुलांचा मृत्यू झाला याचं मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना कुठलंच दुख नसल्याचं त्याच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे.

दरम्यान, योगी आदित्यनाथ यांनी यापूर्वी बनारसमध्ये स्वाईन फ्लूवरुनही वादग्रस्तव वक्तव्य केलं होतं. स्वाईन फ्लू रोगाचा लोक विनाकारण बाऊ करत असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं होतं.

दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी गोरखपूरमधील बालमृत्यू प्रकरणावरुन आज भाजपवर निशाणा साधला. ‘गोरखपूरमधील बालमृत्यू म्हणजे हत्याकांडच आहे. पण पावसाच्या बातमीत ही बातमी वाहून गेली.’ असं उद्धव ठाकरे म्हणाले.