अयोध्या : राम मंदिरावरुन पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज अयोध्येत दाखल होणार आहेत. ते दोन दिवसीय अयोध्या दौऱ्यावर असतील. तसेच विश्व हिंदू परिषदेने उद्या धर्म संसदेचं आयोजन केले आहे. या दोन्ही संघटनांच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे. राम जन्मभूमीला चारही बाजूंनी सुरक्षेचा वेढा आहे. त्यामुळे अयोध्यानगरीला छावणीचं रुप आलं आहे.


अयोध्येत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी एक अतिरिक्त पोलीस महासंचालक स्तराचे अधिकारी, एक पोलीस महानिरीक्षक, तीन वरिष्ठ पोलीस अधीक्षक, 10 अतिरिक्त पोलीस अधीक्षक, 21 क्षेत्र अधिकारी, 160 पोलीस निरीक्षक, 700 कॉन्स्टेबल, तसेच पीएसीच्या 42 आणि आरएएफच्या पाच कंपन्या तैनात करण्यात आले आहे. त्याशिवाय एटीएसचे कमांडो आणि आकाशातून नजर ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेरे लावण्यात आले आहेत.

बाबरी मशिद पाडण्यासाठी 17 मिनिटं लागतात, मग मंदिर निर्माणाचा कायदा बनवण्यासाठी सरकार विलंब का लावत आहे, असा प्रश्न शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला.

उद्धव ठाकरेंचा अयोध्येतील कार्यक्रम

अयोध्येतल्या क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य असे वेगवेगळे समाज, भोजपुरी सभा यांच्याकडून उद्धव ठाकरे यांचा नागरी सत्कार केला जाणार आहे. 'लक्ष्मण किला' वर उद्धव ठाकरे यांचा साधूसंतांकडून सत्कार होणार आहे. रामचरित मानस आणि रामललांची मूर्ती घेऊन उद्धव ठाकरे दुपारी 2 वाजता येणार आहेत. पूजेनंतर ते साधूसंतांकडून आशीर्वाद घेतील. 'लक्ष्मण किला'वरील कार्यक्रम संपल्यानंतर संध्याकाळी 5.15 वाजता उद्धव ठाकरे चालत शरयूच्या काठावर जाऊन आरती करतील.

दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता उद्धव ठाकरे राम जन्मभूमीत रामललांचं दर्शन घेतील. दुपारी 12 वाजता पत्रकारांशी तर एक वाजता जनतेशी हिंदी भाषेत संवाद साधतील. शिवनेरी गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या मातीचा कलश घेऊन उद्धव ठाकरे अयोध्येत जात आहेत. शिवनेरीवर बाल शिवाजी आणि जिजामाता यांना अभिवादन करुन उद्धव ठाकरेंनी माती सोबत घेतली आहे. संजय राऊत, राजन विचारे, एकनाथ शिंदे, विश्वनाथ महाडेश्वरही अयोध्येला गेले आहेत.

शिवसेनेविषयी धाकधूक

शिवसेनेबद्दल यूपीतील जनतेच्या मनात थोडीशी धाकधूक आहे. शिवसेना उग्र संघटना असल्याचा अयोध्येतील स्थानिकांचा समज आहे. व्यापाऱ्यांच्या मनातही गर्दीची धास्ती आहे. या कार्यक्रमामुळे काही दिवस प्रवेशबंदी होऊन लोकांना आत प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांचं नुकसान होतं. ही गर्दी म्हणजे ग्राहक नसल्याने व्यापारी चिंताग्रस्त आहेत.

हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय

भव्य राम मंदिर उभारणीच्या मागणीसाठी शिवसेनेसह काही हिंदुत्ववादी संघटना अयोध्येमध्ये एकत्र येणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'चलो अयोध्या' हा नारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्येमध्ये तणाव वाढत असून व्यापारी वर्गाच्या मनात भीतीची भावना आहे. अयोध्येतील व्यापाऱ्यांनी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. फैजाबादच्या संयुक्त व्यापार मंडळाने विश्व हिंदू परिषदेच्या धर्मसभेला विरोध केला आहे.

मुंबईकर उत्तर भारतीयांचा पाठिंबा

मुंबईतील उत्तर भारतीयसुद्धा या दौऱ्याला पाठिंबा देत आहेत. राज्यभरातील विविध भागातून शिवसैनिक अयोध्येला आले आहेत. पुण्यातील शिवैसनिक बाईकने तर नाशकातील शिवसैनिक विशेष ट्रेनने अयोध्येला आले. वारकरी अयोध्येला आषाढी-कार्तिकीला पंढरीची वाट धरणारे वारकरी राम जन्मभूमी अयोध्येला आले. शिवसैनिकांच्या 'जय श्रीराम' एक्स्प्रेसमध्ये वारकरीही सहभागी झाले होते. अयोध्येत रामाचं भव्य मंदीर उभं रहावं अशी त्यांचीही मागणी आहे.

शिवसैनिकांचा ड्रेसकोड

नाशिकहून अयोध्येला जाणाऱ्या शिवसैनिकांना ड्रेसकोड ठरवून देण्यात आला आहे. पांढऱ्या रंगाच्या टीशर्टवर पुढच्या बाजूला 'चलो अयोध्या'चा नारा आणि श्रीरामाची प्रतिमा, तर मागील बाजूला बाळासाहेब, उद्धव आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो, आपापल्या जिल्ह्याचं नाव आहे. अयोध्येत गेल्यावर सर्व शिवसैनिक एकसंघ दिसावेत, यासाठी ड्रेस कोड ठरवण्यात आला आहे. टोपीवर एका बाजूला जिल्ह्याचं नाव आणि दुसऱ्या बाजूला जय श्रीरामचा नारा आहे.

हर हिंदू की यही पुकार...

अयोध्या दौऱ्यावेळी महिला आघाडी आणि युवासेनेनं अयोध्येत येऊ नये, असे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले होते. महिलांना लक्ष्मणरेषा पाळण्याचं आवाहनही उद्धव ठाकरेंनी केलं होतं. अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी “हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार” असा नवा नारा दिला.

आखाडा परिषदेने निमंत्रण धुडकावलं

साधूसंतांची सर्वात मोठी संस्था अखिल भारतीय आखाडा परिषदेने शिवसेनेचं आमंत्रण केवळ धुडकावलंच नाही तर उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर राजकीय खेळी केल्याचा गंभीर आरोपही केला आहे. "आखाड्याशी संबंधित साधू-संत शिवसेनेच्याच नाही तर 25 नोव्हेंबर रोजी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमातही सहभागी होणार नाहीत," असं आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी स्पष्ट केलं होतं.