हैदराबाद : आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टण येथील स्टील कारखान्यात भीषण दुर्घटना (Accident) घडली असून वितळून गेलेल्या स्टीलमुळे कंपनीतील 8 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वितळवण्यात आलेल्या स्टीलचा मोठा साठा एका क्रेनच्या सहाय्याने एका ठिकाणाहून दुसरीकडे नेत असताना स्टीलचा लाव्हा खाली पडल्याने ही अंगावर थरकाप उडवणारी घटना घडली. गरम वितळलेलं स्टील कामगारांच्या (Labour) अंगावर पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. मात्र, या घटनेनं कंपनीतील कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

Continues below advertisement

विशाखापट्टणम स्टील प्लांटमध्ये मोठी दुर्घटना घडली असून, वितळलेल्या लोखंडाची गळती झाल्याने 8 कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत अनेक कामगार जखमी झाले आहेत. अत्यंत उच्च तापमानावर वितळलेल्या पोलादाने भरलेल्या करछुलीमध्ये (लॅडलमध्ये) झालेल्या स्फोटामुळे हा अपघात घडला. दुर्घटनेनंतर प्लांटमध्ये एकच गोंधळ उडाला, दुर्घटनेनंतर कामगार आपला जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले होते. दरम्यान, स्टील प्लांटचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करत आहेत.

मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंकडून शोक

Continues below advertisement

मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत मृतांना श्रद्धांजली वाहिली. तसेच, घटनास्थळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधून मृतांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केल्या. अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना घटनास्थळावरील सद्यस्थिती तसेच सुरू असलेल्या बचाव आणि मदतकार्याची माहिती दिली. नायडूंनी सर्व शासकीय विभागांना समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले असून, बचाव आणि मदतकार्य वेगाने व प्रभावीपणे पूर्ण करण्याच्या सूचना केल्या आहेत.

मदत व बचावकार्याला गती देण्याचे निर्देश

राज्याच्या गृहमंत्री वंगलापुडी अनीता यांनी विशाखापट्टणम स्टील प्लांटमधील दुर्घटनेबाबत प्रतिक्रिया दिली. तसेच, जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून दुर्घटनेची माहिती घेत सूचनाही केल्या आहेत. गृहमंत्र्यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या (PRO) माहितीनुसार, जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्याचे तसेच दुर्घटनास्थळी बचाव आणि मदतकार्य वेगाने राबविण्याचे निर्देश दिले आहेत. घटनेची माहिती मिळताच गृहमंत्री तातडीने दुर्घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क ठेवून परिस्थितीचा आढावा घेत असून आवश्यक त्या सूचना देत आहेत.

हेही वाचा

अंबड तहसीलदार लाच प्रकरणात ट्विस्ट, तक्रारदार सुयोग सोळुंकेला अटक; दोन दिवसांची पोलीस कोठडी