लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधानांनी काल लखनऊमधील रामलीला कार्यक्रमाला उपस्थिती लावली. या कार्यक्रमावेळी पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात 'जय श्रीराम'च्या जयघोषाने केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. यावरुन विश्व हिंदू परिषदेनेही पंतप्रधानांवर निशाणा साधला. रामाचा जयघोष करता तर मग राम मंदिरही बांधा, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे.


लखनऊमधील लक्ष्मणनगरीतील रामलीला कार्यक्रमाला काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थिती लावली. त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात 'जय श्रीराम'च्या जयघोषाने केली. तसेच त्यांनी आपल्या भाषणात रामायणातले संदर्भ देत, आपल्याला दहशतवादरुपी रावणाचं दहन करायचं असल्याचं सांगितलं.

उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीचं बिगुल 2017 मध्ये वाजणार आहे, त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात 'जय श्रीराम' या जयघोषाने केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. 90 च्या दशकात भाजपने 'जय श्रीराम'चाच नारा देऊन आयोध्येतील राम मंदिर आंदोलन सुरु केले होते. या आंदोलनाने संपूर्ण देशाचे वातावरण ढवळून निघाले आणि भाजपने केंद्रातली सत्ताही हस्तगत केली. त्यामुळे आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊनच पंतप्रधानांनी 'जय श्रीराम'चा जयघोष केल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.


तर दुसरीकडे जय श्रीरामच्या जयघोषावरुन विश्व हिंदू परिषदेने पंतप्रधांना लक्ष्य केलं आहे. विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी ट्वीट करुन ''पंतप्रधानांनी 'जय श्रीराम'चा जयघोष केलाच आहे, तर संसदेत कायदा करुन अयोध्येत भव्य राम मंदिर उभारावे,'' अशी मागणी केली आहे.