देहरादून : विराट कोहलीने आपल्या फलंदाजींने अनेक गोलंदाजांना पाणी पाजलं आहे. आपल्या मेहनतीने आणि खेळातील सातत्याने तो आज प्रसिद्धीच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचला आहे. त्यामुळेच देशातल्या बलाढ्य कंपन्यादेखील त्याला आपल्या कंपनीचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर बनवण्यासाठी पायघड्या घालत आहेत.


पण दुसरीकडे उत्तराखंड सरकारकडून त्याला देण्यात आलेल्या मानधनावरुन वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत. कारण उत्तराखंडचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर असलेल्या विराटने उत्तराखंड पर्यटन विभागासाठी एक मिनिटाची जाहिरात शूट केली होती. यासाठी त्याला राज्य सरकारने आपत्ती व्यवस्थापन निधीतून पेमेंट दिलं आहे.

'टाईम्स ऑफ इंडिया'नं याबाबतचं वृत्त प्रकाशित केलं असून, या वृत्तानुसार, एका भाजप नेत्याने आरटीआय दाखल करुन याबाबची माहिती मागवली होती. त्यावर मिळालेल्या उत्तराच्या आधारे विराटला 47.19 लाख रुपये आपत्ती व्यवस्थापन निधीतून दिल्याचा, दावा भाजप नेत्यानं केला आहे. तसेच हा खर्च 2013 मध्ये उत्तराखंडमध्ये आलेल्या पुरात मदत आणि पुनर्वसनासाठी राज्य सरकारला मिळालेल्या आपत्ती व्यवस्थापन निधीतून केल्याचं भाजप नेत्यानं सांगितलं आहे.

तर दुसरीकडं सरकारच्या वतीनं एका अधिकाऱ्याने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. मुख्यमंत्री हरिश रावत यांचे माध्यम सल्लागार सुरेंद्र कुमार यांनी सांगितले की, ''हा भाजपचा डाव असून, भाजपचा या निवडणुकीत पराभव होणार असल्याने ते अशाप्रकारचे आरोप करत आहेत.'' तसेच याबाबतची सर्व प्रक्रिया कायदेशीर पद्धतीने करण्यात आली असून, भाजपचे सर्व दावे खोटे असल्याचं कुमार यांचं म्हणणं आहे.

दरम्यान, याबाबत विराट कोहलीच्या एजंटने दिलेल्या माहितीनुसार, यासंदर्भात कोणतेही व्यवहार झाले नसल्याचे त्याने सांगितलंय.