पणजी :  पणजीतून अपक्ष लढण्याची घोषणा केल्यानंतर उत्पल पर्रीकर यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. याबाबतचे पत्र त्यांनी गोवा प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे आणि केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना दिले आहे. माझा भाजप सदस्यत्वाचा राजीनामा स्वीकारावा. आतापर्यंत आपण केलेल्या सहकार्याबद्दल आभार, असं त्यांनी नारायण राणेंना दिलेल्या पत्रात म्हटलं आहे. 


पणजीऐवजी बिचोलीतून उमेदवारी घ्यावी हा भाजपचा प्रस्ताव उत्पल पर्रिकर यांनी नाकारला असून आता ते पणजीतून अपक्ष लढणार आहेत. तशा प्रकारची घोषणा त्यांनी काल केली होती. उत्पल पर्रिकरांचा हा निर्णय भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. उत्पल पर्रिकर हे भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांचे पुत्र आहेत. 




गोव्यासाठी भाजपकडून 34 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपच्या या यादीत पणजीतून उत्पल पर्रिकर यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्याऐवजी त्यांना बिचोलीतून निवडणूक लढवण्याचा पर्याय देण्यात आला होता. त्यामुळे उत्पल पर्रिकरांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. 


माझी भूमिका ठाम आहे, मी पणजीतूनच लढणार. दुसऱ्या जागेवरुन लढण्याचा कुठलाही विचार नाही अशी भूमिका उत्पल पर्रिकरांनी या आधीच मांडली होती. 


पणजी गोव्याच्या राजकारणात कायम केंद्रस्थानी देखील राहिली आहे. गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री आणि केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचा हा मतदारसंघ. पण या मतदारसंघातून भाजपने उत्पल पर्रिकरांना डावलून बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बाबूश मोन्सेरात यांचे तिसवाडी तालुक्यातील तालीगांव, साताक्रुझ, सातआंद्रे या ठिकाणी समर्थक आमदार आहेत. शिवाय, मोठ्या संख्येनं असलेल्या कॅथलिक मतदारांचा असलेला पाठिंबा ही देखील त्यांच्या जमेची बाजू. केवळ पक्षनेत्यांची मुलं आहेत म्हणून उमेदवारी देण्याची भाजपमध्ये पद्धत नाही, असं भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं. 



संबंधित बातम्या :