नवी दिल्ली : नोटाबंदीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 50 दिवसांची डेडलाईन दिली आहे. मात्र 30 डिसेंबरनंतरही बँकेतून पैसे काढण्याच्या मर्यादेत कोणतीही वाढ होणार नसल्याची माहिती, बँकिंग तज्ञांनी दिली आहे. इतकंच नाही तर एटीएममधूनही पैसे काढण्याची मर्यादा फक्त 500 ते 1 हजार रुपयांनी वाढू शकते.


नोटाबंदीचा आज 47 वा दिवस आहे. त्यामुळे 50 दिवस कळ सोसा मग चित्र बदलेल,असा दावा पंतप्रधान मोदींनी केला होता. त्याला आता केवळ 4 दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे नववर्षात तरी चलनकल्लोळ थांबणार का, असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झालाय.

चलनकोंडी फुटायला फेब्रुवारी उजाडेल : अरुंधती भट्टाचार्य


रिझर्व बँक ऑफ इंडियाकडे पुरेशा नोटा नसल्याने फेब्रुवारीपर्यंत चलनकल्लोळ कायम राहण्याचा अंदाज वर्तवला जातोय. स्टेट बँक ऑफ इंडियानेही फेब्रुवारीच्या सुरुवातील एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा हटवली जाऊ शकते, असा अंदाज वर्तवला आहे.

पंतप्रधान मोदींनी 8 नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर चलनातून जुन्या पाचशे आणि हजारच्या नोटा हद्दपार करण्यात आल्या. बँकेतून नव्या नोटा काढण्यासाठी मर्यादा घालण्यात आलेली आहे. ही मर्यादा 30 डिसेंबरपर्यंत राहिल, असा अंदाज लावला जात होता. मात्र बँकिंग तज्ञांच्या माहितीनुसार ही मर्यादा कायम राहणार आहे.