मुंबई : आठवीपर्यंत विद्यार्थ्यांची केली जाणारी ढकलगाडी बंद करण्याच्या हालचाली सरकारनं सुरु केल्या आहेत. केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नापास न करण्याचा निर्णय मागे घेण्याबाबत चर्चा झाली. ढकलगाडीला मनाई करण्याच्या प्रस्तावाला बैठकीत मंजुरी मिळाली आहे.


इयत्ता पाचवी आणि आठवीत विद्यार्थी नापास झाल्यास त्याला दुसरी संधी दिली जाणार आहे. मात्र पुनर्परीक्षेतही तो नापास झाल्यास विद्यार्थ्याला त्याच वर्गात पुन्हा बसवलं जाऊ शकतं म्हणजेच नापास केलं जाऊ शकतं. लवकरच असा ठराव संसदेत मांडला जाणार आहे.

मुलांना मुक्त आणि सक्तीचे शिक्षण मिळण्याचा अधिकार सुधारणा विधेयकात या तरतुदी केल्या जाणार आहेत. शिक्षणाच्या अधिकारा अंतर्गत सध्या आठवीपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला नापास केलं जात नाही. त्याचप्रमाणे देशात 20 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्था निर्माण करण्याचाही केंद्राचा मानस आहे.