नवी दिल्ली : काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक आज सकाळी 11 वाजता होणार आहे. सोनिया गांधी यांच्या हंगामी अध्यक्षपदाला एक वर्षे पूर्ण झालंय, नव्या अध्यक्ष निवडीची चर्चा सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. दरम्यान, सोनिया गांधी राजीनामा देणार असल्याच्या चर्चा आहे. पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांनीच पक्षाच्या अवस्थेबद्दल जागृत करणारं पत्र सोनिया गांधींना लिहिण्याचं धाडस दाखवलं आहे.


काँग्रेस वर्किंग कमिटीची आजची बैठक वादळी ठरणार अशी दाट शक्यता दिसत आहे. कारण अध्यक्षपदाच्या निवडीवरुन सुरु असलेला पेच तातडीने संपवावा, अशी मागणी पक्षातूनच व्हायला लागली आहे. पक्षातल्या 23 नेत्यांनी त्याबाबत सोनिया गांधी यांना लिहिलेल्या एका पत्राचीही सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. भाजपचा वाढता विस्तार आणि युवकांनी मोदींना दिलेली साथ या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचा जनाधार कमी होत असून तातडीने तळापासून मोठ्या बदलांची आवश्यकता असल्याचं या पत्रात म्हटलं आहे.


काँग्रेस पक्षाला पूर्णवेळ उपलब्ध होईल असा अध्यक्ष हवा




  • पक्षाच्या घटनेनुसार वर्किंग कमिटीवरच्या नियुक्त्या अंतर्गत निवडणुकीतून व्हाव्यात

  • पक्षाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी एक संस्थात्मक यंत्रणा पक्षात बनवली जावी

  • पक्षांतर्गत निवडणुका यादेखील निवडणुकीच्या माध्यमातून करणारी पारदर्शी यंत्रणा स्थापित व्हावी

  • काँग्रेस वर्किंग कमिटीची सध्याची रचना ही प्रभावी नाही. कुठलाही नवा राजकीय कार्यक्रम यातून दिला जात नाही. केवळ औपचारिकपणे निवदेनं काढली जातात असाही तक्रारीचा सूर या पत्रात आहे.


गेल्या वर्षभरापासून काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाचा हा पेच कायम आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधींनी तडकाफडकी राजीनामा दिला, त्यानंतर गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष होणार का याची चर्चा सुरु झाली. पण पुन्हा हंगामी अध्यक्ष म्हणून सोनिया गांधींकडेच धुरा आली. पण प्रकृती कारणामुळे या वयात त्या ही जबाबदारी पूर्णपणे पेलू शकत नाहीत. या पत्रात अध्यक्षपद गांधी कुटुंबानेच घ्यावं असा उल्लेख नाही. पण किमान तातडीने पुढे येऊन ही जबाबदारी उचलावी, कारण पक्षाच्या प्रतिमेला तडे जात आहेत अशी भावना त्यातून दिसत आहे.


हे पत्र लिहिणारे सगळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, मनीष तिवारी, शशी थरुर यांच्यासह मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण, जीतिन प्रसाद, मिलिंद देवरा अशा अनेक नेत्यांचा यात समावेश आहे.


सोनिया गांधींच्या हंगामी अध्यक्षपदाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. पुढच्या काही महिन्यात बिहार, बंगाल आणि नंतर यूपी, गुजरातच्या निवडणुका आहेत. त्यामुळे अध्यक्षपदाचा हा पेच फार काळ प्रलंबित ठेवणं पक्षाला परवडणारं नाही. त्यात आता ज्येष्ठांच्या या पत्राचाही दबाव असल्याने आता अध्यक्षपदाबाबत आजच्या वर्किंग कमिटीत काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं असेल.


गांधी घराण्याबाहेरचा कुणीतरी अध्यक्ष निवडा असं सांगत राहुल गांधींनी एक वर्षांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिला. लोकसभा निवडणुकीतलं प्रचंड अपयश हे त्यामागचं कारण होतं. आता पुन्हा गांधी घराण्याचाच सहारा काँग्रेस मागणार की खरोखर काही बोल्ड निर्णय होणार हे लवकरच कळेल.