गुजरातमधील जनता भाजपवर नाराज, शिवसेनेचा भाजपवर निशाणा
एबीपी माझा वेब टीम | 18 Dec 2017 04:43 PM (IST)
निवडणूक निकालाचे कल पाहाता गुजरातमधील जनता भाजपवर नाराज असल्याची प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
फाईल फोटो
मुंबई : गुजरात निवडणूक निकालावरुन शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला आहे. निवडणूक निकालाचे कल पाहाता गुजरातमधील जनता भाजपवर नाराज असल्याची प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपला कडवी झुंज दिली आहे. 182 पैकी भाजपला 99 तर काँग्रेसला 80 जागांवर आघाडी मिळाली आहे. भाजपने 150 जागांचे लक्ष्य ठेवलं होतं. पण अद्याप भापला हा आकडा गाठता आलेला नाही. यावरुनच शिवेसना खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी म्हटलंय की, "गुजरातच्या विकास मॉडेलचा दाखला देत, भाजप देशात सत्तेत आली. पण निकालावरुन, गुजरातमधील जनता भाजपवर खुश नसेल, तर याचा अर्थ समजून घेतला पाहिजे." ते पुढे म्हणाले की, "देशाची सुरक्षा, काश्मीर मुद्दा, नोटाबंदी, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आदी प्रश्नांची सोडवणूक करण्यात मोदी सरकार सपशेल अपयशी ठरलं आहे." दरम्यान, शिवसेनेचं मुखपत्र सामनामधूनही राहुल गांधींचं कौतुक करण्यात आलं आहे. सामनामध्ये म्हटलंय की, "सध्या काँग्रेसची अतिशय बिकट अवस्था आहे. अशावेळी काँग्रेसची धूरा राहुल गांधींच्या खांद्यावर देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात काहीच गैर नाही. त्यांनी निवडणूक निकालाची परवा न करता, स्वत: ला प्रचाराच्या आखाड्यात स्वत:ला झोकून दिलं होतं." दुसरीकडे शिवसेनेच्या टीकेवरुन भाजप खासदार किरीट सोमय्यांनी शिवसेनेवर टीका करणारं ट्वीट केलं आहे. 'गुजरात आणि हिमाचलमध्ये भाजप पडण्याचे दिवा स्वप्न पाहणारे आमचे मित्र उद्धवजी ठाकरे आणि शिवसेनेला आत्ता तरी जाग येणार , जमिनीवर येणार, ही देवाला प्रार्थना...' अशा शब्दात त्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.