Sanjay Raut : लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक ही सरकारनं आमच्यावर लादली असल्याचे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. तुम्ही उपाध्यक्षपद जर विरोधकांना दिले तर निवडणुकांचा आम्ही फेरविचार करु अशी इंडिया आघाडीची भूमिका होती. पण सुंभ जळला तरी पिळ कायम आहे, तो पिळही उतरेल असं म्हणत राऊतांनी भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल केला. परंपरेनं उपाध्यक्षपद हे विरोधी पक्षाला दिलं जातं. विरोधी पक्ष हा मोठा आहे. विरोधी पक्षाचा आकडा हा 240 चा असल्याचे संजय राऊत म्हणाले. 


राहुल गांधींना राम राम करुनच मोदींना सभागृहात बसावं लागेल


पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या ईस्ट इंडिया कंपनीला कोण अटी शर्ती घालणार असेही राऊत म्हणाले. गेल्या 10 वर्षात त्यांच्या अटी शर्तीवरच लोकसभा चालली आहे. पण आता ते शक्य होमार नसल्याचे संजय राऊत म्हणाले. इतका मोठा विरोधी पक्ष आहे. आता तर राहुल गांधी हे विरोधी पक्षनेता म्हणून समोर बसले आहेत. त्यामुळं राहुल गांधींना राम राम करुनच शिष्टाचारानुसार मोदींना समोर बसावं लागले असेही राऊत म्हणाले. त्यामुळं आता संसदेच अधिवेशन सुरु असताना मोदींना पळ काढता येणार नाही, कारण समोर आता राहुल गांधी बसलेत असंही राऊत म्हणाले. 


राहुल गांधी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद स्वीकारलं हे शुभसंकेत


राहुल गांधी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद स्वीकारलं ही देशाच्या दृष्टीनं शुभसंकेत आहेत. त्याबद्दल आम्ही राहुल गांधी यांचे आभार मानत असल्याचे संजय राऊत म्हणाले. दरम्यान, आज महाविकास आघाडीची मुंबईत बैठक होणार होती. विधानसभेच्या दृष्टीनं प्राथमिक चर्चेला आज सुरुवातही करणार होतो. पण आज काँग्रेस नेत्यांची दिल्लीत बैठक होणार आहे. यामुळं काही नेते दिल्लीत आले आहेत. त्यामुळं आज होणारी मुंबईतील बैठक रद्द होणार आहे. लवकरच मुंबईत महाविकास आघाडीचीबैठक होईल असे राऊत म्हणाले.  


पॅलेस्टाईनचा नाव घेणं हा काय गुन्हा आहे का?


पॅलेस्टाईनचा नाव घेणं हा काय गुन्हा आहे का? असा सवालही राऊतांनी उपस्थित केला. पॅलेस्टाईनच्या बाबतीत भारत सरकारचं धोरण काय हे त्यांनी आधी स्पष्ट करावं असंही राऊत म्हणाले. पॅलेस्टाईनमध्ये मानवतेचा संहार होताना आम्ही पाहतोय. मी कोणाच्याही कृतीचं समर्थन करत नसल्याचेही राऊत म्हणाले.  पॅलेस्टाईनमध्ये मानवतेचा संहार होऊ नये ही नरेंद्र मोदी यांचीही भूमिका असल्याचे राऊत म्हणाले. जगभरात नरसंहारावर चिंता व्यक्त करण्यात आली हे आपण मान्य केले पाहिजे. दरम्यान, ओवीसींकडून काही चूक झाली असेल तर सरकारनं कारवाई करावी असेही राऊत म्हणाले. दरम्यान, सध्या पॅलेस्टाईनमध्ये जो नरसंहार सुरु आहे, त्याची जगाला चिंता असल्याचे राऊत म्हणाले. 


महत्वाच्या बातम्या:


नोव्हेंबरनंतर महाराष्ट्रात आपलाच मुख्यमंत्री, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य; शिवसेना मेळाव्यातून फटकेबाजी