मुंबई : उत्तरप्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीची लगबग सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. उत्तरप्रदेशमध्ये शिवसेना स्वतंत्र लढवेल.  आमची जेवढी ताकद आहे, त्या ताकदीनं लढू, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. दिल्लीत एबीपी माझाशी बोलताना त्यांनी विविध विषयावर संवाद साधला. 


बॅंकाच्या निर्णयाबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, बॅंका बुडवणारे कोण आहेत ते पाहा. बॅंका बुडवण्यामागे कोणाची प्रेरणा आहे ते पहावं लागेल. बॅंका का बुडत आहेत यासंदर्भात तपास करावा लागेल. मुंबईत आम्ही अनुभव घेतलाय. सरकारच्या निर्णयाचं स्वागतच आहे. ठेवीदारांचा पैसा सुरक्षित राहील या संदर्भात पावलं टाकणं गरजेचं आहे, असं ते म्हणाले. 


'शरद पवार विरोधी पक्षाचे भीष्म पितामह,  ममता बॅनर्जी राष्ट्रीय राजकारणाचं आकर्षण' : संजय राऊत


संजय राऊत म्हणाले की,  ममता बॅनर्जी यांचे शरद पवारांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत.  उद्धव ठाकरेंशी संबंध चांगले आहेत. ममता बॅनर्जी यांचं म्हणणं आहे की, आधी एकत्र यावं. नेता कोण असावं हे नंतर ठरवता येईल. तृणमूल पक्षाची बैठक असल्यानं ते बैठकीला उपस्थित राहू शकले नाही. विकास कामासंदर्भात ममता बॅनर्जी या गडकरींना भेटत असतील, असंही ते म्हणाले. 


या सरकारच्या हातात देश सुरक्षित नाही 
संसदेच्या कामकाजाविषयी बोलताना ते म्हणाले की, मोदी-शाह चर्चेला 3 तास का देऊ शकत नाहीत. या सरकारच्या हातात देश सुरक्षित नाही.  सरकारला संसद चालू द्यायची नाही. सरकारला गोंधळ निर्माण करायचंय. पेगासिसवर सत्य ऐकण्याची भिती त्यांना वाटतेय.  विरोधी पक्ष जनतेचा आवाज असतो. केंद्र सरकार गोंधळात प्रवृत्त करतेय.  विधेयक गोंधळात संमत करायची हे सरकारला हवंय. सरकारला लोकशाहीवर संसदीय प्रणालीवर विश्वास नाही. पेगॅसिस चर्चावर मोदींनी, अमित शाहांनी संसदेत उपस्थित रहावं, असंही राऊत म्हणाले. कृषी कायद्याच्या विषयावर चर्चा व्हायला हवी, असं ते म्हणाले.


शरद पवार विरोधी पक्षाचे भीष्म पितामह, ममता बॅनर्जींकडे देश आशेनं पाहतोय- राऊत 
राऊत काल म्हणाले होते की, शरद पवार विरोधी पक्षाचे भीष्म पितामह आहेत. तर ममता बॅनर्जी राष्ट्रीय राजकारणाचं आकर्षण आहे, असं देखील संजय राऊत म्हणाले. ममताजी सोनिया गांधींना भेटणार आहेत. काँग्रेस शिवाय विरोधकांची एकजूट होऊ शकत नाही. ममता बॅनर्जींकडे देशातील विरोधी पक्ष आशेनं पाहतोय. समर्थ पर्याय उभा राहू शकतो. ममता बॅनर्जी यांना पराभूत करण्यासाठी भाजपने सत्ता संपत्ती तपास यंत्रणेचा पुरेपूर वापर केला.  याचं कौतुक पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांनाही असेल.  ममता बॅनर्जी राष्ट्रीय राजकारणाचं आकर्षण ठरल्या आहेत, असं राऊत म्हणाले.