Lata Mangeshkar : भारताच्या गानकोकिळा भारतरत्न  लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे काल निधन झाले. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर केंद्र सरकारकडून दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. आज राज्यसभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राज्यसभेचे सभापती व्यकंय्या नायडू यांनी शोकप्रस्ताव सादर केला. त्यानंतर एका तासासाठी राज्यसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे. लता मंगेशकर यांच्या निधनाने देश स्तब्ध झाला असल्याचे नायडू म्हणाले. 


लता मंगेशकर यांच्या जाण्यामुळे देशाचं अतोनात नुकसान झालं असून, एक चांगली पार्श्वगायिका देशाने गमावली आहे. त्यांच्या रुपाने भारतीय संगीत आणि चित्रपट क्षेत्रातील एक दयाळू व्यक्ती आणि एक उत्तुंग व्यक्तिमत्व आपण गमावलं आहे. त्यांच्या जाण्यानं एका युगाचा अस्त झाला आहे. यामुळे संगीत क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी भरुन न निघण्यासारखी असल्याचे नायडू म्हणाले.





 


गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे रविवारी निधन झाले. वयाच्या 93व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला. भारतीय संगीतक्षेत्रातलं एक महत्वाचं पर्व लतादीदींच्या निधनानं संपलं आहे. लतादीदींच्या निधनावर विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. तसेच भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने आज सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. 


कोरोनाची लागण झाल्यामुळे लता मंगेशकर यांना 9 जानेवारीच्या रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना न्यूमोनियाची देखील लागण झाली होती. त्यानंतर 30 जानेवाराली लता मंगेशकर या कोरोनामुक्त झाल्या होत्या. मात्र, अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांचे निधन झाले. ब्रीच कँडी रुग्णालयात 29 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.