Rahul Gandhi Scathing Attack on PM Modi: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधताना राहुल गांधी म्हणाले की, परराष्ट्र धोरणाची सध्याची स्थिती "एका तडजोड करणाऱ्या व्यक्तीच्या शोषणाचा परिणाम आहे." त्यांनी पश्चिम आशियातील युद्ध आणि अमेरिकेसोबतच्या व्यापार कराराबद्दल ही टिप्पणी केली. राहुल गांधी यांनी संसदेत 11 फेब्रुवारी रोजी केलेल्या भाषणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्यांनी तेल खरेदीवरून अमेरिकेकडून सुरु असलेल्या मुस्कटदाबीवर जोरदार हल्ला चढवला होता.
तडजोड करणाऱ्या व्यक्तीच्या शोषणाचा परिणाम
राहुल गांधी यांनी X वर म्हटलं आहे की, "भारताचे परराष्ट्र धोरण आपल्या लोकांच्या सामूहिक इच्छेने आकारले जाते. ते आपल्या इतिहासात, आपल्या भूगोलात आणि सत्य आणि अहिंसेवर आधारित आपल्या आध्यात्मिक नीतिमत्तेत रुजले पाहिजे." त्यांनी आरोप केला, "आज आपण जे पाहत आहोत ते धोरण नाही. ते तडजोड करणाऱ्या व्यक्तीच्या शोषणाचे परिणाम आहे."
काय म्हटलं होतं राहुल गांधी यांनी?
11 फेब्रुवारी रोजी राहुल यांनी आता अमेरिका ठरवणार की आम्ही कोणाकडून तेल खरेदी करतो. अमेरिका आमच्याकडे येईल आणि म्हणेल की तुम्ही यांच्याकडून, त्यांच्याकडून किंवा आणि कोणाकडून तेल खरेदी करू शकत नाही. रशिया, इराण, त्यांना कोणाकडून हवे ते ठरवतील. आमचे पंतप्रधान निर्णय घेणार नाहीत. ते निरीक्षण करतील. ते लक्ष ठेवतील, म्हणजे ते पाहतील आणि जर भारत त्यांना नको असलेल्या कोणाकडून तेल खरेदी करेल तर ते आम्हाला शिक्षा करतील. दरम्यान, एक दिवस आधी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या संघर्षादरम्यान भारताला आलेल्या अडचणींवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता.
तरीही पंतप्रधानांनी यावर भाष्य केलेले नाही
राहुल गांधींनी सोशल मीडिया X वर पोस्ट केले, "जग एका अस्थिर टप्प्यात प्रवेश करत आहे. एक भयानक संकट पुढे येत आहे." भारताचा तेल पुरवठा धोक्यात आहे, कारण आपल्या आयातीपैकी 40 टक्क्यांहून अधिक भाग होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जातो. एलपीजी आणि एलएनजीसाठी परिस्थिती आणखी वाईट आहे.' राहुल गांधींनी लिहिले की, 'संघर्ष आपल्या शेजारी पोहोचला आहे; हिंदी महासागरात एक इराणी युद्धनौका बुडाली आहे. तरीही पंतप्रधानांनी यावर भाष्य केलेले नाही. अशा वेळी आपल्याला स्थिर नेतृत्वाची आवश्यकता आहे. उलट, भारताकडे असे पंतप्रधान आहेत जे तडजोड करत आहेत आणि त्यांनी धोरणात्मक स्वायत्तता सोडली आहे.'
इतर महत्वाच्या बातम्या
