Rahul Gandhi Disqualified : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द करणं हा लोकशाहीवरचा हल्ला आहे. त्यांचं सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय लोकशाहीविरोधी आहे. देशाची लूट करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात आवाज उठवला म्हणून राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली, अशा शब्दात काँग्रेस नेत्यांनी टीका केली आहे. तर लोकशाहीला धक्का देणारा निर्णय आज घेण्यात आला, त्याचा आम्ही निषेध करतो, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिली.


राहुल गांधी यांची खासदारकी रद्द


काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी केरळमधील वायनाड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले आहेत. सुरत न्यायालयाने त्यांना काल दोन वर्षांची शिक्षा सुनावल्याने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 10 जुलै 2013 च्या निकालानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.


हा निर्णय लोकशाहीविरोधी : नाना पटोले 


राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. हा निर्णय लोकशाही विरोधी आहे. नरेंद्र मोदी यांचं सरकार केवळ मोदींसाठी काम करत आहे. राहुल गांधी सरकारविरोधात आवाज उठवत आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात खोटी तक्रार दाखल करुन गुजरातमधील एका न्यायालयातून निर्णय घेत त्यांची खासदारकी रद्द केली आहे. लोकशाही व्यवस्थेचा माध्यमातून केंद्रीय यंत्रणा मागे लावण्याचा प्रयत्न सुरु आहे. देशाची लूट करण्याचा प्रयत्न ज्यांनी केला त्यांच्याविरोधात आवाज उठवला म्हणून त्यांनी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली.


लोकशाहीला धक्का देणारा निर्णय : अजित पवार


काही दिवसांपूर्वी आमच्या खासदारची खासदारकी रद्द करण्यात आली. आता राहुल गांधी यांची देखील खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकशाहीला धक्का देणारा निर्णय आज घेण्यात आला. आम्ही त्याचा निषेध करत अहोत. अंतिम आठवड्या प्रस्ताव सुरु असताना ही बातमी आली आणि त्यानंतर आम्ही सभागृह त्याग केला आहे. त्यांनी इंदिरा गांधी यांच्याबाबत देखील असेच वागले होते. मात्र तयानंतर सोनिया गांधी सत्तेत आल्या होत्या, अशी प्रतिक्रिया


राहुल गांधी सरकारच्या दडपशाहीला घाबरणार नाहीत : बाळासाहेब थोरात


राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणं हा लोकशाहीवरचा हल्ला आहे. भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी यांची लोकप्रियता वाढली. संपूर्ण देशात पायी चालून जनतेची मनं जोडण्याचं काम केलं. केंद्र सरकार, मोदी आणि अदानींचे संबंधावर उत्तर मागितलं. राहुल गांधी यांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे. राहुल गांधी यांच्या दडपशाहीला घाबरणार नाही. मला खात्री आहे, या सगळ्याच परिणाम म्हणून राहुल गांधी या देशाचे पंतप्रधान झालेले दिसतील, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.


भाजप भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालतंय? : प्रियंका गांधी


राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याच्या निर्णयानंतर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी? वाड्रा यांनी ट्वीट करुन भाजपला सवाल विचारला आहे. ज्या लोकांनी देशाचा पैसा लुटला भाजप त्यांच्या समर्थनार्थ का उतरत आहे. चौकशी करण्यापासून हात का झटकत आहेत? जे लोक यावर आवाज बुलंद करत आहेत, त्यांच्यावर खटले दाखल केले जात आहेत. भाजप भ्रष्टाचाऱ्यांचं समर्थन करते? असं प्रियंका गांधी यांनी लिहिलं आहे.






काय आहे प्रकरण?


राहुल गांधीनी कर्नाटकमध्ये प्रचारादरम्यान राहुल गांधींनी मोदी आडनावावरुन टीका केली होती. राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. त्यानंतर काल (23 मार्च) त्यासंदर्भात सूरतच्या जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान राहुल गांधींना दोषी ठरवण्यात आले. त्यानंतर त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. राहुल गांधींनी जामीनासाठी अर्ज केला. राहुल गांधीचा जामीन मंजूर झाला आहे. मात्र या शिक्षेची अंमलबजावणी 30 दिवसांसाठी स्थगित करण्यात आली. तसंच उच्च न्यायालयात जाण्यासाठी कोर्टाने राहुल गांधींना 30 दिवसांचा वेळ दिला आहे.