चंदीगड : पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणाला उत्तर देताना शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. या घोषणेनंतर त्यांनी शेतकऱ्यांची वाहवा मिळवली, मात्र काही काळातच त्यांच्यावर पुन्हा टीकाही सुरु झाली.


पंजाब सरकार अल्पभूधारक म्हणजे 5 एकरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार आहे, अशी घोषणा कॅप्टन अमरिंदर सिंहांनी केली. मात्र मुख्यमंत्री कार्यालयाकडून जे पत्रक जारी करण्यात आलं, त्यामध्ये वेगळंच काही तरी सांगण्यात आलं होतं.

शेतकरी कोणताही असो, केवळ 2 लाख रुपयांपर्यंतच कर्ज माफ केलं जाईल, असं पत्रकामध्ये म्हटलेलं होतं. त्यामुळे सभागृहाच्या बाहेर येताच अमरिंदर सिंहांचा हा निर्णय बदलल्याचं दिसून आलं.

अल्पभूधारक शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाईल, असं अमरिंदर सिंहांनी सांगितलं होतं. विशेष म्हणजे त्यांनी पेपरवर लिहिलेलं भाषण वाचून दाखवलं होतं. मात्र त्यांच्या भाषणाची प्रतही पत्रकारांना देण्यात आली नाही.