NEET Paper Leak Protest Updates : वैद्यकीय प्रवेशासाठी झालेल्या 'नीट' (NEET) परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि सीबीएसई (CBSE) परीक्षांमधील गोंधळावरून देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत आहे. या प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तातडीने राजीनामा द्यावा, या मागणीसाठी पुण्यात 'कॉकरोच जनता पार्टी'च्या वतीने एक मोठे आणि लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. त्यासोबत कॉकरोज जनता पार्टीच्या वतीने पाच मोठ्या मागण्या करण्यात आल्या.
सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून तरुणांचा आवाज उठवणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या या आंदोलनात प्रसिद्ध समाजसेवक सोनम वांगचूक (Sonam Wangchuk) आणि या चळवळीचे मुख्य समन्वयक अभिजित दीपके (Abhijit Dipke) यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी हजेरी लावली होती.
पुण्यात झालेल्या या आंदोलनात बहुसंख्येने तरुण आणि विद्यार्थी सहभागी झाले होते, तसेच ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला. या आंदोलनाच्या सुरुवातीला हैदराबाद विद्यापीठातील दिवंगत विद्यार्थी रोहित वेमुला याला सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली.
Cockroach Janta Party Demands : आंदोलकांच्या प्रमुख 5 मागण्या
आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकार आणि शिक्षण मंत्रालयासमोर खालील प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत:
1. जर कोणत्याही परीक्षेचा पेपर फुटला, तर प्रभावित झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला शासनाकडून 10,000 रुपये आर्थिक नुकसानभरपाई मिळाली पाहिजे.
2. परीक्षा आयोजित करण्यासाठी टेंडर घेणाऱ्या कंपन्यांचे कडक ऑडिट झाले पाहिजे. मंत्र्यांच्या जवळच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना अशी टेंडर्स मिळता कामा नयेत.
3. परीक्षेचा निकाल एका ठराविक मुदतीतच जाहीर झाला पाहिजे.
4. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर येण्या-जाण्याचा वाहतूक खर्च शासनाने द्यावा.
5. शिवरायांचा इतिहास : NCERT च्या पाठ्यपुस्तकातून वगळलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या 'हिंदवी साम्राज्याचा नकाशा' पुन्हा समाविष्ट करण्यात यावा.
Cockroach Janta Party On Hindu Muslim Politics : द्वेषाच्या राजकारणाला पूर्णविराम
यापुढे तरुण पिढी कोणत्याही हिंदू-मुस्लिम किंवा धार्मिक राजकारणाला बळी पडणार नाही असं आश्वासन सर्वांनी दिलं पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. सरकारचं हिंदू-मुस्लिम राजकारण यापुढे चालणार नाही, असा इशाराही कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने देण्यात आला.
Abhijeet Dipke Reply To Devendra fadnavis : मुख्यमंत्र्यांवर टीका
अभिजीत दीपके म्हणाले की, "मुख्यमंत्री म्हणतात की या आंदोलनात सहभागी झालेले लोक समाजात अराजकता पसरवत आहेत. मला मुख्यमंत्र्यांना विचारायचे आहे की, हक्कासाठी लढणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेणे म्हणजे अराजकता पसरवणे आहे का? मुख्यमंत्री टीका करतात की आम्हाला संविधान माहीत नाही, आम्ही फक्त पुस्तक हातात पकडले आहे. मला त्यांना उलट विचारायचं आहे की, चोरून पहाटेचा शपथविधी पार पाडणे कोणत्या संविधानात लिहिलं आहे, ते आधी त्यांनी सांगावे."
हेही वाचा:
