Prophet Remarks Row :  भाजप नेत्या नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे देशभरातून संताप निर्माण होत आहे. मुस्लिम समाज त्यांच्या वक्तव्याविरोधात रस्त्यावर उतरला आहे. शर्मा यांच्यावर कारावाई करण्यात यावी अशी मागमी मुस्लिम समाजातून होत आहे. याच प्रकरणावरून आता  एआयएमआयएमचे ( Aimim) प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) भाजप आणि केंद्र सरकारवर भडकले आहेत. "नुपूर शर्माच्या वक्तव्यानंतर भाजपने त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी 10 दिवस का लावले? हिंसाचार रोखणे ही सरकारची जबाबदारी आहे, असे ओवेसी यांनी म्हटले आहे. 


"पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षाने नुपूर शर्मा यांच्यार कारवाई करण्यासाठी दिरंगाई का केली? असा प्रश्न उपस्थित करत ओवेसी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. "नुपूर शर्मा यांच्यावर यापूर्वीच कारवाई व्हायला हवी होती. त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला असेत तर कायद्याला त्याचे काम करू द्यायला पाहिजे होते. 2014 पासून देशभरात मॉब लिंचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कुणाच्या घरात का घुसता? तुम्ही सरन्यायाधीश आहात का? पंतप्रधान हे देशातील प्रत्येक व्यक्तीचे पंतप्रधान आहेत. त्यांनी लोकांच्या भावना समजून घ्यायला पाहिजेत," असे ओवेसी यांनी म्हटले आहे. 


प्रेषित मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपने पक्षाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना निलंबित केले होते. या प्रकरणी ओवेसी यांनी नुपूर शर्मा यांना अटक करावी, अशी मागणी केली आहे.  


असदुद्दीन ओवेसी म्हणाले, "हे सरकार बुलडोझरचे राजकारण करत आहे. काही झालं की बुलडोझर चालवायला मिळतो, मग आता नुपूर शर्माच्या घरावर बुलडोझर चालणार का? ज्यावेळी देशातील मुस्लिमांचा प्रश्न येतो त्यावेळी पंतप्रधान मोदी मुस्लिम बांधवांच्या भावना समजून घेत नाहीत. पंतप्रधानांना भारतीय मुस्लिमांचे दुःख कळत नाही. भाजपने देशातील मुस्लिमांचा अपमान केला आहे.  


"नुपूर शर्मा यांच्यावर कारवाई केली असती तर कानपूरमध्ये हिंसाचार झाला नसता. आता तेथील मुस्लिमांवर कारवाई केली जात आहे. कानपूर प्रकरणाचे समर्थन करणार नाही. परंतु, सरकारने योग्य वेळी कारवाई केली असती तर तेथे हिंसाचार झाला नसता, असा आरोप ओवेसी यांनी केला आहे.