मुंबई : राज्यात अगोदर स्पर्धा परिक्षांच्या पेपरफुटीवरुन किंवा चुकीच्या पद्धतीने कागदपत्रांची पूर्तता करुन सरकारी नोकरी प्राप्त केल्याची प्रकरणे समोर येत होती. मात्र, थेट युपीएससी (UPSC) सारख्या केंद्रीय आयोगाच्या परीक्षेत बोगस प्रमाणपत्र सादर करुन चक्क आयएएस पदाला गवसणी घातल्याचा प्रकार उघडकीस आल्याने राज्यासह देशभरात खळबळ उडाली आहे. प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) प्रकरणावरुन विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. यापूर्वी नीट परीक्षा आणि युजीसी नेट परीक्षांचा असाचा सावळा-गोंधळ पाहायला मिळाला होता. त्यानंतर, आता चक्क युपीएससी परीक्षेतील ही बोगसगिरी पुढे आल्यानंतर आता काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी केंद्र सरकारला सवाल केले आहेत. तसेच, युपीएससी परीक्षा देणारे विद्यार्थी किती मेहनत घेतात, हे मी स्वत: पाहिलंय, असेही प्रियंका गांधी यांनी म्हटलंय.


राज्यात गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर बोगस प्रमाणपत्रावरुन प्रशासन चांगलंच ढवळून निघालं आहे. केवळ, राजकीय नेत्यांच्याच बोगसगिरीवरुन, भ्रष्टाचारावरुन सातत्याने प्रश्न विचारले जातात. मात्र, पूजा खेडकर यांच्यामुळे प्रशासनातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचे काळे कारनामे आता समोर येत आहेत. एकापाठोपाठ एक असे अनेक बोगस अधिकारी या घटनेनंतर समोर आल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, पूजा खेडकर यांचं प्रकरण माध्यमांत आल्यानंतर आता युपीएससीने दखल घेत, पूजा खेडकर यांना नोटीसही बजावली आहे. तुमच्यावर फौजदारी गुन्हा का दाखल करु नये, अशा शब्दात आयोगाने खेडकर यांच्यावरील कारवाईला सुरुवात केली आहे. मात्र, या घटनेमुळे युपीएससी परीक्षेतही बोगसगिरी चालत असेल तर सर्वसामान्यांनी परीक्षा द्यायच्या की नाही, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही ट्विट करुन सरकारला प्रश्न विचारले आहेत. 


युवकांच्या विश्वासावर मोठा आघात


मी स्वत: युपीएससी परीक्षेसाठी विद्यार्थी दिवसरात्र एक करुन मेहनत घेताना, आपल्या भविष्याची स्वप्न रंगवताना पाहिले आहेत. त्यामुळे, युपीएससी परीक्षेतील घोटाळ्याचे वृत्त मन हेलावून टाकणारे आहे, कारण या प्रक्रियेतील एकही बोगसगिरी अनेक प्रश्न उपस्थित करते. लाखो युवकांचे स्वप्न आणि त्यांच्या विश्वासावर मोठा आघात करते. त्यामुळेच, जनता आणि युपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या प्रश्नांची उत्तरे मिळायला हवीत, असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.


प्रमाणपत्र तपासणीची व्यवस्था निर्माण होईल का?


राजकीय हस्तक्षेपाने या उच्च पदावर नियुक्त झालेले लोकच यास जबाबदार आहेत? जर असतील तर त्यांच्यावर कारवाई कधी, असाही सवाल प्रियंका गांधींनी विचारला आहे. तसेच, नकली प्रमाणपत्रामुळे एससी, एसटी, ओबीसी, विकलांग व ईडब्लूएस प्रवर्गातील उमेदवारांना मिळणाऱ्या संधीवर बाधा आणतो. त्यामुळे, हे प्रमाणपत्र तपासणी करणारी एखादी संस्था विकसित केली जाईल का?, असेही प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे. 






दरम्यान, प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खडेकर यांन मसुरी येथील प्रशिक्षणार्थी केंद्रात परत बोलवण्यात आले आहे. मात्र, त्या सध्या वाशिम जिल्ह्यातच असल्याचे समजेत. त्यांच्यावरील कारवाईलाही सुरुवात झाली आहे.