नवी दिल्ली : सतत होत असलेल्या पराभवामुळं पिछाडीवर आलेल्या काँग्रेसमधील नेत्यांवर आणि नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभ राहत असताना आता माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पुस्तकातून काँग्रेस नेतृत्वावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं निधन ऑगस्ट महिन्यात झालं. त्यांनी 2014 च्या काँग्रेसच्या पराभवाला माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना जबाबदार धरलं आहे. त्यांनी या पुस्तकात लिहिलं आहे की, काँग्रेसचे काही सदस्य असं मानत होते की जर ते पंतप्रधान झाले तर पक्षाच्या हातून सत्ता गेली नसती. 'द प्रेसिडेंशियल इयर्स' या आपल्या पुस्तकातून त्यांनी हे गौप्यस्फोट केले आहेत.


आपली राष्ट्रपतीपदी नियुक्ती झाल्यानंतर काँग्रेसनं राजकीय दिशा गमावली


प्रणव मुखर्जी यांनी आपलं पुस्तक 'द प्रेसिडेंशियल इयर्स' मध्ये लिहिलं आहे की, आपली राष्ट्रपतीपदी नियुक्ती झाल्यानंतर काँग्रेसनं राजकीय दिशा गमावली. सोनिया गांधी पक्षातील मुद्द्यांना सांभाळू शकल्या नाहीत. तर मनमोहन सिंग यांची संसदेतील अनुपस्थितीमुळे खासदाराशी त्यांच्या वैयक्तीक संबंधांवरही पूर्णविराम लागला, असं मुखर्जी यांच्या पुस्तकात लिहिलं असल्याचं म्हटलंय. माझ्या पक्षातील काही सदस्यांचं असं मत होतं की 2004 मध्ये जर पंतप्रधान असतो तर 2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसवर दारूण पराभव ओढवला नसता. परंतु या मताशी मी सहमत नाही, असं त्यांनी म्हटलंय.


जानेवारीमध्ये होणार पुस्तकाचं प्रकाशन


"द प्रेसिडेंशियल इयर्स" हे प्रणव मुखर्जी यांचं पुस्तक जानेवारी 2021 मध्ये प्रकाशित होणार आहे. प्रणव मुखर्जी यांनी हे पुस्तक आपल्या राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळातील अनुभवावर लिहिलं होतं. तसेच या पुस्तकात पश्चिम बंगालच्या एका गावात प्रणव मुखर्जी यांनी घालवलेल्या बालपणापासून ते राष्ट्रपतीपदापर्यंतच्या प्रवासाचं वर्णन करण्यात आलं आहे. या पुस्तकात मुखर्जी यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे, ज्या गोष्टींवर आधी ते कधीच बोलले नव्हते.