नवी दिल्ली : भारताला अस्थिर करण्याचा शत्रूचा डाव आहे. मात्र, हा डाव यशस्वी होऊ देणार नाही. भारताची प्रगती रोखणं हे दहशतवादाचं लक्ष्य असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीतील भाजपच्या ‘मेरा बुथ सबसे मजबूत’ या कार्यक्रमाची सुरुवात मोदी यांच्या उपस्थितीत करण्यात आली.


कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी बोलताना मोदींनी भारत-पाकिस्तान दरम्यान सुरु असलेल्या तणावावर भाष्य केलं. देशांत शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं मोदी यावेळी म्हणाले. संपूर्ण देश एक आहे आणि तो खंबिरपणे लष्कराच्या पाठिशी उभा असल्याचंही मोदी यावेळी म्हणाले.

भारताला अस्थिर करण्याबरोबरच आपली प्रगती थांबावी, देश थांबला पाहिजे हाही दहशतवाद्यांचा उद्देश असतो, म्हणूनच सर्वांनी एकत्र उभे राहिले पाहिजे. आमचा सैन्याच्या सामर्थ्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे असं काहीही होऊ नये, ज्यामुळे त्यांच्या मनोधैर्यावर परिणाम होईल किंवा शत्रूंना आपल्याकडे बोट दाखवण्याची संधी मिळेल असं मत नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं

सध्या देशाची भावना वेगळ्या स्तरावर आहे. देशाचा वीर जवान सीमेवर आणि सीमेपारही आपला पराक्रम दाखवत आहे. संपूर्ण देश एक आहे आणि आपल्या जवानांच्या पाठीशी उभा आहे. जग आपली इच्छाशक्ती पाहत असल्याचेही मोदी म्हणाले.