नवी दिल्लीः आपले जवान देशासाठी प्राणांची आहुती देत आहेत. त्यामुळे ही दिवाळी त्यांच्या नावानेच साजरी केली पाहिजे, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' या कार्यक्रमातून केलं.


मोदींनी मन की बातमधून देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या. 'संदेश 2 सोल्जर' या हॅश टॅगचा सर्व भारतीयांनी वापर केला. त्यामुळेच जवानांसाठी एखाद्या लाटेप्रमाणे शुभेच्छांचा वर्षाव झाला. 10 लाख भारतीयांनी जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यामुळे त्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल, असा विश्वासही पंतप्रधान मोदींनी बोलून दाखवला.

जवानांना आपण शुभेच्छा देतो, तेव्हा आपण त्यांच्यासोबत असल्याची भावना त्यांच्यात निर्माण होते. भारताची सर्व सेना सीमेवर आपलं संरक्षण करत आहे. त्यामुळेच आपण आज दिवाळी साजरी करत आहोत, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात'मधील महत्वाचे मुद्दे

  • दिवाळीचा उत्सव अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश देतोः पंतप्रधान मोदी

  • दिवाळी सणाला आपण घराची स्वच्छता करतो. त्यामुळे हा सण साफ-सफाईशी निगडीत आहे. त्यामुळे सणाच्या निमित्ताने फक्त घरच नाही तर, परिसर, गाव यांची सुद्धा स्वच्छता ठेवली पाहिजे, ही वेळेची गरज आहेः पंतप्रधान मोदी

  • भारतीय जवान प्रत्येक क्षणाला देशप्रेमाच्या भावनेतून प्रेरित होऊन काम करत राहतातः पंतप्रधान मोदी

  • समाजाला मुलगा-मुलगी या भेदभावापासून दूर न्यायचं आहेः पंतप्रधान मोदी

  • ज्या भागाला आपल्याकडून अपेक्षा आहेत, त्यांना संबोधित करण्याची ही वेळ आहेः पंतप्रधान मोदी

  • 31 ऑक्टोबर आपल्यासाठी मोठा दिवस आहे. देशाच्या एकतेचा मंत्र देणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांची उद्या जयंती आहे.

  • भारत असा देश आहे, जिथे 365 दिवस सण साजरे केले जातातः पंतप्रधान मोदी