Kartvyapath Inauguration : पंतप्रधान नरेंद्र यांच्या हस्ते सेंट्रल विस्टा प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात  आलं. यावेळी राजपथचं नाव बदलून कर्तव्यपथ करण्यात आले. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी या क्षणाचे साक्षीदार होण्याचं भाग्य लाभल्याच्या भावना व्यक्त केल्या. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचे उद्घाटन केले. त्यामुळे आता  तो 'कर्तव्य पथ' म्हणून ओळखला जाईल. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी इंडिया गेटवरील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे अनावरणही केले.  "नेताजी सुभाषचंद्रबोस यांनी 1947 च्या आधी आंदमानवर तिरंगा फडकवला होता आणि लाल किल्यावर तिरंगा फडकवण्याचं स्वप्न पाहिलं होतं. नेताजींच्या पुतळ्यामुळे देशाला प्रेरणा मिळेल. आम्ही आता गुलामीची ओळख मिटवली आहे, अशा भावना यावेळी पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या. 


पंतप्रधान म्हणाले, गुलामगिरीचे प्रतीक असलेला किंग्सवे म्हणजेच राजपथ आजपासून इतिहासाचा विषय बनला आहे. तो कायमचा पुसला गेला आहे. वसाहतवादाच्या आणखी एका प्रतीकातून बाहेर पडल्याबद्दल मी देशातील सर्व जनतेचे अभिनंदन करतो. हा भारताच्या लोकशाही भूतकाळाचा जिवंत मार्ग आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार असलेल्या सर्व देशवासियांचे मी मनापासून स्वागत करतो. 






"गेल्या आठ वर्षात आम्ही असे अनेक निर्णय घेतले ज्यावर नेताजी सुभाषचंद्र बोस यांची छाप होती. अंदमान आणि निकोबार बेटांवर राष्ट्रध्वज फडकवणारे ते 'अखंड भारत'चे पहिले प्रमुख होते. आज इंडिया गेटजवळ आपले राष्ट्रीय महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचाही मोठा पुतळा बसवण्यात आला आहे. गुलामगिरीच्या वेळी ब्रिटीश राजवटीच्या प्रतिनिधीचा पुतळा होता. आज त्याच ठिकाणी नेताजींच्या पुतळ्याची स्थापना करून देशाने आधुनिक, सशक्त भारताचे जीवनही प्रस्थापित केले आहे, अशा भावना पंतप्रधान मोदी यांनी यावेळी व्यक्त केल्या. 


पंतप्रधान म्हणाले, "आज देशाने ब्रिटिश काळापासून चालत आलेले शेकडो कायदे बदलले आहेत. इतकी दशके ब्रिटीश संसदेची वेळ पाळणाऱ्या भारतीय अर्थसंकल्पाची वेळ आणि तारीखही बदलण्यात आली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून आता देशातील तरुणांना परकीय भाषेच्या सक्तीतून मुक्त केले जात आहे. कर्तव्याचा मार्ग हा केवळ विटा आणि दगडांचा मार्ग नसून तो भारताच्या लोकशाही भूतकाळाचा आणि सर्वकालीन आदर्शांचा जिवंत मार्ग आहे.