श्रीनगर : शेजारी देशात बघा, अमेरिकेला कसं पळून जावं लागलं आहे. केंद्र सरकारने जम्मू काश्मीरवर चर्चा नाही केली तर त्याचे गंभीर परिणाम होतील असा इशारा पीडीपीच्या अध्यक्षा आणि जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारला दिला आहे. कुलगाम या ठिकाणी एका जनसभेत बोलताना त्यांनी हा इशारा दिला आहे.  


मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, "आमची परीक्षा घेऊ नका, वेळीच सुधारणा करा. अमेरिकेची एवढी मोठी ताकत असून सुद्धा त्यांना अफगाणिस्तान सोडून जावं लागलं. माजी पंतप्रधान वाजपेयींनी ज्या प्रकारे जम्मू काश्मीरवर चर्चा सुरु केली होती त्याच प्रकारे केंद्र सरकारने आता चर्चा केली पाहिजे. 


मेहबूबा मुफ्ती पुढे म्हणाल्या की, "गेल्या दोन वर्षांपासून जम्मू काश्मीरच्या लोकांवर ज्या प्रकारे अन्याय करण्यात आला आहे, ज्या प्रकारे त्यांच्या अधिकारांचे दमन केलं आहे ते पाहता लोकांच्या असंतोषाचा उद्रेक कधीही होऊ शकतो. त्यावेळी भारतीय लष्कराचं तेच हाल होईल जे अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेचं झालं. एक छोटीशी मुंगीही बलाढ्य हत्तीला सळो की पळो करु शकते. काश्मीरी लोक भ्याड नाहीत, पण शस्त्रही उचलणार नाहीत. ज्यावेळी लोकांचा संयम सुटेल त्यावेळी तुम्ही राहणार नाही."


केंद्र सरकारने ऑगस्ट 2019 मध्ये जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 रद्द केलं आहे. त्या वेळीपासून त्या ठिकाणी निवडणुका झाल्या नसून केंद्र सरकारच्या हातामध्ये सर्व अधिकार एकवटले आहेत. केंद्र सरकारने जम्मू काश्मीरचे विभाजन करुन जम्मू, काश्मीर आणि लडाख असे तीन केंद्र शासित प्रदेश निर्माण केले आहेत. वेगळ्या राज्याचा दर्जा काढून घेतल्याने त्या ठिकाणच्या राजकारण्यामध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे. 


महत्वाच्या बातम्या :