नवी दिल्ली: पाकिस्तानाने कैदेत असलेल्या कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांना दिलेल्या वागणुकीबाबत, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेत निवेदन दिलं.


पाकिस्तानने नीचपणाचा कळस गाठल्याचं सांगत, सुषमा यांनी भर संसदेत पाकिस्तानची निंदा केली.

सुषमा स्वराज यांच्या निवेदनाला सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिला.

काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी हा केवळ जाधव कुटुंबाचा नव्हे तर संपूर्ण देशाचा अपमान असल्याचं नमूद केलं.

आझाद म्हणाले, “सुषमा स्वराज यांच्या निवेदनाला काँग्रेसचा पाठिंबा आहे. कुलभूषण जाधव यांच्यावर पाकिस्तानने खोटे-नाटे आरोप लावले आहेत. आपण संसदेत आक्रमक बोलल्यामुळे त्याचा त्रास कुलभूषण यांना होऊ नये, किंबहुना आपल्या बोलण्याने पाकिस्ताने त्याचा बदला कुलभूषण यांच्यावर घेऊ नये, याची आपण काळजी घेऊ.

लोकशाहीवर विश्वास नसलेल्या पाकिस्तानला आख्खा देश आणि जग ओळखतं. कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीचं मंगळसूत्र उतरवलं, त्यांच्या चपला, कपडे बदलायला लावणं हे सर्व म्हणजे केवळ जाधव कुटुंबाचा नव्हे तर भारतातील 130 कोटी जनतेच्या आई-बहिणीचा अपमान आहे”

सरकारशी आमचे राजकीय मतभेद असू शकतात. मात्र देशाच्या प्रतिष्ठेचा, आया-बहिणींच्या इज्जतीचा प्रश्न येतो, तेव्हा आम्ही ते सहन करणार नाही. अशावेळी आम्ही सरकारसोबत राहू,  असं गुलाम नबी आझा म्हणाले.

पाकिस्तानचा निषेध: सुषमा स्वराज

कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबाला मानवता आणि सद्भावनेच्या आधारे भेटीची परवानगी दिल्याचे सांगणाऱ्या पाकिस्तानने मानवताही दाखवली नाही आणि सद्भावनाही. पाकिस्तानने हा प्रचाराचा मुद्दा बनवला. जाधव यांची आई फक्त साडी नेसते, त्यांचेही कपड बदलण्यात आले. त्यांना साडीऐवजी सलवार-कुर्ता परिधान करण्यास भाग पाडलं. इतकंच नाही तर त्यांची टिकली आणि मंगळसूत्रही काढायला लावलं, हा पाकिस्तानचा नीचपणा आहे, त्याचा निषेध, असं सुषमा स्वराज म्हणाल्या. सुषम स्वराज यांचं निवेदन वाचण्यासाठी क्लिक करा



संबंधित बातम्या

कुलभूषण यांच्या पत्नी आणि आईला पाककडून विधवेप्रमाणे वागणूक : स्वराज